‘हे संतापजनक…’ रितेश देशमुख भडकला, शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना ठणकावलं


अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा आगामी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) नुकत्याच करण्यात आलेल्या काही आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानांवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर आता रितेश देशमुखने अतिशय कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

रितेश देशमुख यांची सोशल मीडियावरील संतप्त पोस्ट

शिवरायांबाबत विकृत वक्तव्य करणाऱ्यांचा समाचार घेताना रितेशने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक अत्यंत प्रभावी आणि भावनाप्रधान पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं, “कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.” “असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्षे आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्षे भविष्यातही राहील आणि ते नाव म्हणजे प्रौढप्रतापपुरंदर… क्षत्रियकुलावतंस… सिंहासनाधीश्वर… महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.”

याशिवाय, एका मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रितेश आणि जेनेलिया यांनी स्पष्टपणे ठणकावून सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अपशब्द वापरल्यास ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही.

नागपूर (Nagpur) येथील जामठा परिसरातील एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केले. त्यांनी असा दावा केला की, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे गुरू-शिष्याचे नाते होते. त्यांनी एक किस्सा सांगितला की, युद्ध करून थकलेले शिवाजी महाराज एकदा रामदास स्वामींकडे गेले आणि त्यांनी आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवून राज्य सांभाळण्याची विनंती केली. यावर रामदास स्वामींनी सांगितले की, “मी राज्य चालवतो, तुम्ही त्याची अंमलबजावणी करा.” या चुकीच्या दाव्यावरून राज्यभरातील शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पुस्तकाच्या शीर्षकात महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत गायकवाड यांनी कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना थेट फोनवरून जीवे मारण्याची हिंसक धमकी दिली होती. या प्रकरणावर मोठी टीका झाल्यानंतर त्यांनी नंतर माफीही मागितली.

Post a Comment

0 Comments