शिंदेंच्या ‘या’ खासदाराला आला मंत्रिपदासाठी फोन, अजित पवारांचा गट अजून वेटिंगवर


 लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. आता दिल्लीत एनडीएने सरकार स्थापनेसाठी जोरदार तयारी केली आहे. आज 9 जूनरोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी 3.0 सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन करण्यात आले आहेत.

अशात महाराष्ट्रातील कुणा-कुणाला मंत्रिपद दिलं जाणार, याबाबत सर्वांचंच लक्ष लागून होतं. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रामधून पाच जणांना मंत्रिपद जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यांचा समावेश झालाय, त्यांना दिल्लीतून फोन केले जात आहेत.

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना आले फोन यामध्ये महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तर, आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीत मंत्रीपदाच्या यादीत एकनाथ शिंदे गटाला देखील संधी मिळाली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रि‍पदासाठी फोन केला असल्याचं म्हटलं जातंय दुसरीकडे अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांना अजूनही फोन आला नाहीये. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. पण, अजूनही त्यांच्यात कुणालाही मंत्रिपदाबाबत फोन आलेला नाही.

अजित पवार गटाला मंत्रीपद नाहीच?
त्यामुळे शिंदे गटाला तर जागा मिळाली पण, अजित पवार गट अजूनही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आहे. रायगड येथे अजित पवार गटाचा उमेदवार जिंकून आला आहे. पण, मोदींच्या मंत्रीमंडळात  अजूनही या गटातील कुणालाच संधी देण्यात आली नसल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, टीडीपीने आपल्या गटातील मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. TDP नेते जयदेव गल्ला यांनी एक्सवर पोस्ट केले की, त्यांच्या पक्षाला मोदी 3.0 मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळाले आहे. तीन वेळा खासदार असलेले राम मोहन नायडू हे टीडीपी कोट्यातून नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतील आणि पी चंद्रशेखर पेम्मासानी हे राज्यमंत्री असतील. दरम्यान, महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments