लोकसभेतील मोदींच्या विजयामुळे राहुल गांधी झाले मालामाल


देशभरातील प्रत्येक निवडणुकीनंतर शेअर बाजारातील बाजारभावांत बदल होताना पाहायला मिळतात. यावेळी कोणाला नफा होतो तर, कोणाला तोटा सहन करावा लागतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतरही शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून त्यांच्या विजयाचा फायदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झाला आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे त्यांचा पोर्टफोलिओमध्येही वाढ झाली आहे. राहुल गांधींच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये सुमारे 3.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे अनेक कंपन्यांचे शेअर्स असून यामध्ये इन्फोसिस, एलटीआय माइंड ट्री, टीसीएस, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि पिडीलाइट इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावरून ही माहिती मिळाली आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वी सोमवारी बाजारातील वाढीमुळे राहुल गांधींच्या खात्यात सुमारे 3.45 लाख रुपयांची वाढ झाली. मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशीही त्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अंदाजे 4.08 लाख रुपयांची घट झाली होती.

मात्र, त्यानंतर मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि बुधवारपासून शेअर बाजारात तेजी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 13.9 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 6 जून रोजी त्यात सुमारे 1.78 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 31 मे पासून राहुल गांधींच्या पोर्टफोलिओत 3.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांना सुमारे 15 लाख रुपयांचा नफा झाला आहे.

Post a Comment

0 Comments