बहुचर्चित ओमराजे निंबाळकर यांचं पारड जड ठरणार ? की अर्चना पाटील बाजी पलटणार



बार्शी |

धाराशिव जिल्ह्याचं राजकारण म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो पाटील विरुद्ध राजेनिंबाळकर या दोन घराण्यांतील संघर्ष. दोन पिढ्यांमध्ये सुरु असलेला हा संघर्ष यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समोर आला.

ओम राजेनिंबाळकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार होते, तर त्यांच्या भावजय म्हणजेच अर्चना पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. त्यामुळे दोन घराण्यातील संघर्षावरच ही निवडणूक फिरणार असल्याचे स्पष्ट होते. त्याप्रमाणे फिरली देखील. आता या दोघांपैकी मतदारसंघावर, जिल्ह्याच्या राजकारणावर कोणाचा होल्ड राहणार हे येत्या चार जूनलाच स्पष्ट होईल.

विधानसभा निहाय मतदारसंघाची परिस्थिती आणि आकडेवारी 

यातील औसामधून अभिमन्यू पवार आमदार आहेत. याशिवाय निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचीही इथे चांगली ताकद आहे. सोबतच माजी आमदार बसवराज पाटील हेही आता भाजपसोबतच आले आहेत. या सगळ्याचा फायदा अर्चना पाटील यांना होऊ शकतो. महाविकास आघाडीसाठी औसामध्ये शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांनी ओम राजेनिंबाळकरांना पुन्हा खासदार करण्यासाठी जीवाचे रान केले. औसामधील ओमराजेंची स्वतःती ताकद आणि ठाकरेंची सहानुभूती यामुळे 50-50 होण्याचा अंदाज आहे. औसामध्ये यंदा 60.30 टक्के मतदान झाले आहे.

उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले हे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. 2014 मध्ये स्वतंत्र लढल्यानंतरही त्यांचा विजय झाला होता. शिवसेनेचा इथला मतदानाचा टक्का हा कायमच 45 ते 50 टक्क्यांच्या पुढे राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद अर्चना पाटील यांच्यासाठी कामाला येऊ शकते. तर ओमराजेंसाठी इथे माजी खासदार रविंद्र गायक वाड यांची आणि काँग्रेसच्या ताकदीची चांगली मदत होईल असा अंदाज आहे. मात्र इथून अर्चना पाटील या पुढे राहतील असे चित्र आहे. उमरग्यामध्ये 60 टक्के मतदान झाले आहे.

तुळजापूरमध्ये गत दोन्ही लोकसभेला शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. पण यंदा अर्चना पाटील यांना इथून आघाडी मिळेल असे चित्र आहे. याचे कारण इथून त्यांचे पती राणा जगजितसिंह हेच स्वतः आमदार आहेत. शिवाय इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा मुलगा सुनील चव्हाण यांनीही मतदानापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मधुकर चव्हाण यांनीही शरद पवार आणि ओम राजेनिंबाळकर यांच्यापासून अंतर राखले. या घडामोडी अर्चना पाटील यांच्यासाठी बोनस ठरल्या होत्या.

इथे ओम राजेनिंबाळकर यांनी ताकद लावली. इथली राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनीही जोडणी लावली. पवारांसोबत निष्ठेने राहिलेले अशोक जगदाळे, कारखानदार अरविंद गोरे यांच्या मदतीने शरद पवार यांनी ओमराजेंसाठी मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी रणनीती आखली. पण आता तुळजापूरमधून कोण पुढे राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तुळजापूरमध्ये यंदा 65.40 टक्के मतदान झाले आहे.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी ओमराजेंसाठी पायाला अक्षरशः भिंगरी बांधली होती. शिवाय ओम राजेंचेही इथे स्वतःचे मोठे नेटवर्क आहे. 2009 मध्ये पहिल्यांदा ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. इथे ओमराजें यांच्यासाठी सहानुभूतीचाही फायदा होऊ शकतो. पण अर्चना पाटील यांच्यासाठी हा जणू घरचा मतदारसंघ आहे. पद्मसिंह पाटील इथून सातवेळा आमदार होते. तर राणाजगजितसिंह हेही 2014 मध्ये आमदार झाले होते. त्यामुळे सालाबादप्रमाणे इथे यंदाही घासून लढाई होण्याचा अंदाज आहे. उस्मानाबादमध्ये 63.97 टक्के मतदान पार पडले.

परांड्यामध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या मोठ्या ताकदीचा यंदा अर्चना पाटील यांना फायदा होऊ शकतो. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांची ओम राजेंसाठी मदत होईल असे चित्र आहे. इथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. याशिवाय इथे पवार-ठाकरेंच्या सहानुभूतीचीही लाट असल्याचे जाणवून आले. बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे भाजपसोबत आहेत. ते अपक्ष असल्याने त्यांची संपूर्ण ताकद अर्चना पाटील यांच्या मागे उभी राहु शकते. इथे माजी आमदार दिलीप सोपल यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता. त्यांनी हॉस्पिटलमधून येत थेट ओम राजेंच्या प्रचारात सहभागी होत एक भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. परंडामध्ये 63.54 टक्के मतदान झाले आहे.

Post a Comment

0 Comments