सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष



अवघं भारतीय राजकारण ढवळून काढणाऱ्या सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात विविध आरोप झालेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आपली पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपी थरुर यांच्यावर लागला होता. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण बरंच तापलं होतं.

न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. त्यांनी यावेळी सांगितलं की, मागील साडेसात वर्षांपासून या प्रकरणात मला यातना आणि वेदना सहन कराव्या लागत होत्या.

सुनंदा पुष्कर यांचं १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये निधन झालं होतं. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी पुष्कर यांनी पती शशी थरूर यांचे एका पाकिस्तानी पत्रकाराशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. 

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कलम ३०७, ४९८ए अंतर्गत शशी थरूर यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि तिच्याशी क्रूरतेनं वागल्याचा आरोप शशी थरूर यांच्यावर होता.

सुनंदा पुष्कर यांचं मृत्यू प्रकरण देशाच्या राजकारणातील अत्यंत हायप्रोफाईल प्रकरण मानलं जात होतं. २९ सप्टेंबर २०१४ रोजी एम्सच्या वैद्यकीय टीमनं सुनंदा यांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल दिल्ली पोलिसांना सुपूर्द केला होता. ज्यामध्ये सुनंदा यांचा मृत्यू विषानं झाल्याचं म्हटलं होतं.


संबंधित वैद्यकीय टीमनं असंही म्हटलं होतं की, सुनंदा यांच्या पोटात असे अनेक रसायने आढळले आहेत. जी पोटात गेल्यानंतर किंवा रक्तात मिसळल्यानंतर त्याचं विषात रुपांतर झालं आहे.

Post a Comment

0 Comments