एसटीच्या पेट्रोल पंपावर नागरिकांनाही इंधन उपलब्ध होणार



एस.टीने स्वत:च्या आगारातील पेट्रोल पंप लोकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी या संदर्भात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना सांगितले की, राज्यातील एस.टी.चे अनेक पेट्राल पंप मोक्याच्या ठिकाणी आहेत.

आत्तापर्यंत  हे पंप केवळ एस.टी.साठीच वापरता येत होते. मात्र दोन महिन्यांपूर्वी इंडियन ऑईल कंपनीशी आम्ही करार केला आहे. त्याप्रमाणे हे पंप चालविण्याची जबाबदारी एस.टी.चीच राहील. पण येथे सर्वसामान्य नागरिकांनाही पेट्रोल- डिझेल विकत मिळू शकेल. प्रायोगिक तत्त्वावर कोणते पेट्रोल पंप लोकांसाठी सुरू करायचे, हे अजून ठरलेले नाही. येत्या काळात अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय घेताना पेट्रोल पंप नसलेल्या ठिकाणांचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना इंधन सुलभपणे उपलब्ध होऊ  शकेल. एस.टी.चे खासगीकरण करण्याचा शासनाचा विचार नसल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबत पालकमंत्री परब म्हणाले की, जिल्हा नियोजनसाठी २१० कोटी रूपयांचा निधी आला आहे. हा निधी कुठे खर्च करायचा याचा विचार जिल्हा नियोजनच्या बैठकीत केला जाईल. राज्यातील पुरातन मंदिरे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्याची आमची योजना आहे. त्यामध्ये ही मंदिरे पर्यटन खात्याकडे वर्ग करण्याची योजना आहे. पर्यटन विभागाकडून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी देण्याचाही विचार केला जात आहे . बीच शॅक्स योजनेमध्ये काही अडचणी आहेत. त्यादूर करुन ही योजना कार्यान्वित होईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरु करत आहोत. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना बाकीच्या ठिकाणी लागू करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments