“पवारसाहेब पंढरपूर पोटनिवडणुकीची काळजी करु नका, इकडचा कार्यक्रम आम्ही करतो” - जयंत पाटील


पंढरपूर/प्रतिनिधी: 

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. यावरुनच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. “पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, इकडचा कार्यक्रम आमचं आम्ही करतो”, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे ३१ मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवार पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले, “शरद पवार यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैद्यकीय सल्ल्याने ते बाहेर पडतील. या मतदारसंघाची काळजी करु नका असं सांगितलं आहे. प्रचाराला कोण नेते येतील याचं नियोजन लवकरच होईल”
सगळ्यांशी चर्चा करुन भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. वातावरण चांगलं आहे. विजय निश्चित आहे. बंडखोरी झाली असली तरी त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे अर्ज माघरीच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सर्व कायकर्ते घराघरात जाऊन प्रचार करतील, कोरोना काळ असला तरी अनेक राज्यात विधानसभा निवडणुका सुरु आहेत. भाजपचे प्रशांत परिचारक आणि उमेदवार समाधान अवताडे दोघांनी एकमेकाविरोधात निवडणूक लढवली आहे.

त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील असं वाटत नाही. त्या दोघांचे अनेक कार्यकर्ते भगीरथ भालके यांच्या संपर्कात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने आल्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.     

Post a Comment

0 Comments