आमदार भारत भालके यांनी घेतला अखेरचा निरोप उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह दिग्गज नेते उपस्थितीत आमदार भालके यांच्यावर अंतिम संस्कार


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावातील शेतात आमदार भारत भालके यांच्यावर सुपुत्र भगीरथी भालके यांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. आमदार भालके यांना पोलीस दलाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार भालके यांना पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करून बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. भालके यांना अखेरचा निरोप देताना जनसागर लोटला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री दत्ता मामा भरणे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील आमदार खासदार यांची विशेष उपस्थिती होती.

आमदार भारत भालके यांचे २७ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव शरीर २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३५ वाजता पुणे येथून सरकोली (ता. पंढरपूर) मार्गस्थ करण्यात आले. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानावर व पंढरपूर शहरातील शिव तीर्थावर भालकेंची पार्थिव असलेली रुग्णवाहिका आणण्यात आली. यावेळी पंढरपुरातील नागरिकांनी आ. भालके यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिराला वळसा घालून प्रदक्षिणा मार्गावरून मंगळवेढाकडे मार्गस्थ झाले आहे. आमदार भालके यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी मोठा जनसमुदाय जमा झाला होता. भालके यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यापेक्षाही मोठी गर्दी जमा झाली. नाना, हे तुम्ही काय केलात... आम्हाला सोडून का गेलात... तालुक्‍याच्या विकासाचा डाव अर्ध्यावर मोडायला नको होता... अमर रहे अमर रहे, भारतनाना अमर रहे...' अशा घोषणा देत पंढरपूर व मंगळवेढ्यातील नागरिकांची डोळे पाणावले.
जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी सातत्यानं आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असायचा. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण, समाजकारण करणारं त्यांचं नेतृत्वं होतं. भारतनाना भालके यांचं अचानक निघून जाणं ही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची, राष्ट्रवादी काँग्रेसची व माझीही वैयक्तिक हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केले.

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेप्रती आमदार भारतनाना भालके यांचे प्रेम होते. विधीमंडळात सामान्यांचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडून न्याय मिळवून देत. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमी झगडणारा धाडसी लोकनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आ. भारत भालके यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. बबनदादा शिंदे, आ. यशवंत माने, माजी आ. राजन पाटील, आमदार संजय मामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments