प्रशासन चालवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही एखाद्या समाजासाठी शासनाने थांबणे हे चुकीचे आहे. याचा चुकीचा संदेश जातो. त्यामुळे जे १६ टक्के आरक्षण मराठा समाजाचे आहे ते बाजूला काढा व उर्वरित जागा भरा’, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
देश आणि राज्य चालवायचे असेल तर ज्या प्रमाणे आमदार, खासदार ते ग्रामपंचायतीत निवडून आलेला सदस्य पाहिजे असतो त्याचप्रमाणे शासन चालवण्यासाठी नोकरशाही वर्गाची गरज असते.
त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी थांबून राहू नका. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली हे खरे असले तरी त्या निर्णयाच्या अधीन राहून पुढे जायला हवे. १६ टक्के जागा तुम्हाला दिल्या असल्याचे नमूद करून नियुक्तीपत्र देताना या बाबी नमूद करायला पाहिजेत, असे मत आंबेडकर यांनी नोंदवले
दरम्यान, ओबीसी कोट्यामधून मराठा आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे स्पष्ट करताना गरीब मराठा आपल्या बरोबरीला येऊ नये असे श्रीमंत मराठा वर्गाला वाटते आहे आणि त्यामुळेच हा सारा घोळ सुरू आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला. हा घोळ दुरुस्त करता येऊ शकतो. त्यासाठी केवळ इच्छाशक्ती पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.
0 Comments