मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा द्यायला पाहिजे : 'या' केंद्रीय मंत्र्यानी केली मागणी


 पंढरपूर/प्रतिनिधी:

 राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीवर सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकार हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते मंगळवेढा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ बोलत होते. 

मंत्री आठवले पुढे बोलताना म्हणाले की , मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील सर्वांचा पाठिंबा मिळवून समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवायचे आहे. त्यासाठी आपण जीवाचे रान करून प्रचार केला पाहिजे. समाधान आवताडे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत अनेक गरीब, होतकरू, गरजू नागरिकांना मदत केली आहे.त्याच्या या कामाची दखल घेऊन त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. हे या मतदारसंघासाठी मोठ्या फायद्याची गोष्ट आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. पण हे महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, ही शोकांतिका आहे. अशा या सरकारला जनतेने घरी बसवले पाहिजे. उमेदवार समाधान आवताडे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ही निवडणूक आहे. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे आज त्या विषयावर काहीच बोलत नाहीत, त्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे.

 मंगळवेढा- पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत या प्रश्नावर नुसती आश्वासने या जनतेने ऐकली आहेत.आता सुधारणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब शेतकरी सामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. अनेक योजना राबविल्या आहेत. कोरोनाच्या काळात महिला वर्गाला,शेतक-यांना व बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments