“पंतप्रधान मोदींना मिळालेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा देशासाठी…”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावं घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आणि देशाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आजचा दिवस हा लोकमान्यांच्या १०३ व्या पुण्यतिथीचा आहे. त्याचा सोहळा या ऐतिहासिक पुणे शहरात होतो आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की देशात पुण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्या जगाला माहित आहे. याच पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आपल्या देशात अनेक राजे महाराजे होऊन गेले. मोगलांचं संस्थान असेल किंवा यादवाचं संस्थान असेल पण शिवछत्रपतींचं राज्य हे हिंदवी स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. ते रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम पुण्यात झालं हा पुण्याच्या गौरवाचा एक भाग आहे.

अलिकडच्या काळात या देशातल्या जवानांना देशाचं रक्षण करण्यासाठी साठी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याची चर्चा होते आहे. मात्र लाल महालात शाहिस्तेखान जेव्हा आला होता तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला ही गोष्ट विसरता येणार नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. आपण लोकमान्यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्कारासाठी आलो. १८६५ मध्ये लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधरपंत यांनी रत्नागिरी सोडली आणि ते पुण्यात आले. ते नुसतं आगमन नव्हतं तर एक प्रकारची ठिणगी होती. त्यानंतर ती स्वातंत्र्याच्या मशालीचं रुप त्याने घेतलं.

ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर सामान्य माणसाला जागृत केलं पाहिजे हे लोकमान्यांना माहित होतं. त्यासाठी एका जबरदस्त शस्त्राची अवस्था आहे हे त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं सुरु केली. केसरीचा अर्थ सिंह असा होता. लोकमान्य टिळकांनी पत्रकारिता करत परकिय आक्रमणांवर प्रहार केले. ते कायम म्हणत होते की पत्रकारितेवर कुणाचाही दबाव असता कामा नये. ही भूमिका त्यांनी कायमच पाळली. १८८५ मध्ये पुण्यात काँग्रेसचा जन्म झाला. त्या काळात पहिलं अधिवेशन इथेच होणार होतं. पण प्लेगची साथ आली त्यामुळे मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झालं. त्यावेळी मवाळ आणि जहाल असे दोन प्रकारचे नेते होते. जहालांचं प्रतिनिधीत्व लोकमान्य टिळक यांनी केलं. स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो घेतल्याशिवाय मी राहाणार नाही हा नारा दिला. स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्याचं आंदोलन त्यांनी केलं असंही शरद पवार यांनी यावेळी म्हणाले.

गणेश उत्सव, शिवजयंती या उत्सवांमध्ये लोकमान्य टिळक यांचं योगदान मोठं होतं. त्या कालावधीत दोन युगं होती एक टिळक युग आणि दुसरं महात्मा गांधींचं गांधी युग. या दोघांचंही जे योगदान आहे ते देश कधीही विसरु शकत नाही. देशाच्या नव्या पिढीला या नेत्यांचा आदर्श ठेवला गेला पाहिजे. टिळक पुरस्काराला त्यामुळेच आगळंवेगळं महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावं घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.


Post a Comment

0 Comments