आदिनाथ-उर्मिला कोठारे हे कपल मराठी इंडस्ट्रीतलं ‘क्यूट कपल’ म्हणून ओळखलं जातं. दोघांच्या लग्नाला ११ वर्ष झाली आहेत,एक गोंडस ४ वर्षांची ‘जीजा’ नावाची मुलगीही त्यांना आहे. तसं पहायला गेलं तर काल-परवापर्यंत एक आयडियल फॅमिली,गोड कुटुंब असंच त्यांच्याबद्दल बोललं जायचं. पण म्हणतात नं, दुधात मिठाचा खडा पडावा तसं या हसत्या-खेळत्या उर्मिला-आदिनाथच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली अन् सगळंच बिनसत गेलं.
काही दिवसांपासून यांच्यात वैचारिक मतभेद सुरू आहेत अशी बातमी कानावर पडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार मात्र आता कळत आहे की,गेल्या काही महिन्यांपासून उर्मिला ‘कोठारें’च्या घरातनं बाहेर पडली असून मुलीसोबत वेगळी रहात आहे. पण ती आदिनाथ ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीतील दुसऱ्या घरात शिफ्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यांच्या लहान मुलीला सध्या उर्मिला आणि आदिनाथचे आई-वडील सांभाळत आहेत असंही ऐकण्यात आलं आहे.
सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार,उर्मिला-आदिनाथ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून धुसफूस सुरु होती. पण कुटुंबामुळे अन् स्वतःभोवती असलेल्या प्रसिद्धिच्या वलयामुळे ते एकत्र असल्याचं भासवत होते. पण खरंतर जेव्हा ‘चंद्रमुखी’चं म्हणजेच आदिनाथ काम करीत असलेल्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं तेव्हापासून सगळं बिघडत गेलं आहे. वैचारिक मतभेद तिथनंच सुरु झाले. घरातील वरिष्ठ यावर दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे उर्मिला आदिनाथच्या घरातनं बाहेर पडली असली त्याच इमारतीतील ‘कोठारे’ कुटुंबाच्या दुसऱ्या घरात मुलीसोबत शिफ्ट झाल्याचं कळत आहे.
आदिनाथ-उर्मिलामध्ये खटके उडतायत,त्यांच्यात दुरावा आल्यात या बातम्यांना फूस मिळाली जेव्हा आदिनाथनं उर्मिलाच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाला ४ मे रोजी शुभेच्छा दिल्या नाहीत त्यावेळी. आता चाहत्यांना इतकीच अपेक्षा आहे की त्यांच्या या लाडक्या क्यूट कलाकारांनी ‘कपल’ म्हणून पुन्हा एकत्र नांदावं,मतभेद विसरावेत अन् चाहत्यांना गोड सरप्राइज द्यावं.
0 Comments