ईडीकडून कारवाईनंतर भडकलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राऊत यांना शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. पंढरपूर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
पवार म्हणाले, राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत. भाजप सूड भावनेनं कारवाई करत आहे. राऊतांवरही केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई झाल्यानं ते भडकल्याचं आपण समजू शकतो. राहत्या घरी, जिथं आपलं कुटुंब राहतं तिथं अशा प्रकारे राजकीय हेतूनं कारवाई झाल्यानं माणूस भावनिक होतो. व्यक्ती जास्तच भावनिक झाली तर त्याच्या तोंडून निघाणारे शब्द वेगळ्या प्रकारचे असू शकतात. पण सर्वच राजकीय व्यक्तींनी शब्द मोजून-मापून वापरले पाहिजेत. महाराष्ट्रात आधी असं वातावरण कधीही नव्हतं, हे महाराष्ट्रातील जनतेला कळतंय. महाराष्ट्र दिल्लीपुढे कधी झुकला नाही आणि झुकणार नाही”.
भाजपला पोषक भूमिका घेण्याऱ्या राज ठाकरे यांना देखील रोहित पवार यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. भाजपनं त्यांच्या जवळ गेलेल्या पक्षांना संपवलं हा इतिहास राज ठाकरेंनी लक्षात घ्यावा असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. भाजपच्या जवळ जाताना राज ठाकरे यांनी जपून पावलं टाकावीत. मुंबई महापालिकेची निवडणूक समोर आल्यानंतर अचानकपणे राज ठाकरेंनी भूमिका घेतल्या त्या भाजपला पोषक आहेत. भाजपची जी स्टाईल आहे, त्यात ते फक्त आपलाच विचार करतात. हळू हळू ते आपल्या जवळ आलेल्या पक्षाला संपवतात, असंही रोहित पाटील यांनी म्हटलंय.
0 Comments