राणा दाम्पत्याच्या अटकेवरुन फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा


नागपूर - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कलम 153 (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्या अटकेवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर प्रश्नांची सरबत्ती करत निशाणा साधला आहे.

ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना व्यथित करणाऱ्या असून, भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले होत असताना आरोपी अटकेत नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला असताना गुन्हा दाखल होत नाही. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा होत असताना त्याची साधी दखल सुद्धा नाही. हनुमान चालीसा पठनाला राणा दाम्पत्य येतात त्यांना थेट अटक केली जाते, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहे.

पुढे त्यांनी म्हटले, इतकी दंडुकेशाही?, इतका अहंकार?, इतका द्वेश?, सत्तेचा इतका माज?, सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या. पण, जनता सारे काही पाहते आहे. निव्वळ लज्जास्पद, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?, असे प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले आहेत.

उद्या न्यायालयात हजर करणार - राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणात कारवाई केली आहे. उद्या ( 24 एप्रिल ) राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कायदा आणि सुवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि समाजाची शांतता भंग करणे या कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments