रस्त्याच्याकडेला उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर वाळूचा ट्रक पडला; आठ जणांचा मृत्यू



उत्तर प्रदेशमधील कौशांबीमधील कडाधाम येथील देवीगंज चौकामध्ये रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. वाळू वाहून नेणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओ कारवर कोसळल्याने आठ जणांना प्राण गमावावे लागले. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गॅस कटर आणि इतर साहित्याच्या मदतीने गाड्यांचे अवशेष आणि वाळू बाजूला काढून खाली कोणी अडकलेलं नाही ना याची तपासणी सुरु असल्याचे समजते.

या अपघातामध्ये मरण पावलेल्यांमध्ये पुरुष आणि महिलांबरोबरच लहान मुलांचाही समावेश आहे. मरण पावलेले सर्वजण हे स्थानिक रहिवाशी असून हे एका लग्न समारंभावरुन येत होते. घटनास्थळी पोहचलेले जिल्हाधिकारी अमित सिंह यांनी आठ लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाळूने भरलेला ट्रक थेट गाडीवर कोळसल्याने गाडीतील व्यक्तींना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि ते वाळूखाली गाडले गेले. सध्या वाळू उपसण्याचे आणि अपघाताच्या ठिकाणी अन्य लोकं अडकून पडलेले नाहीत ना याची तपासणी केली जात आहे.

न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार कोखराज पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या शहाजादपूरवरुन हे कुटुंब वरातीसाठी आलं होतं. सिराथूमधील लेखापालच्या घरी हा लग्न समारंभ होता. या अपघातामध्ये लेखापालची पत्नी आणि मुलीचाही मृत्यू झाल्याचे समजते.


Post a Comment

0 Comments