राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय नाहीच; 'या' दिवशी होणार घोषणा


सोलापूर : मुलांची सुरक्षितता व आरोग्याची खबरदारी घेऊन २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

मात्र, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून त्यासंदर्भात काहीच आदेश काढले नसल्याने तुर्तास शाळा सुरु होणार नाहीत. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या साडेनऊ लाखांवर पोहचली आहे. 

दुसरीकडे मृतांची संख्या २५ हजाराच्या उंबरठ्यावर आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मृत्यू व कोरोना रुग्णसंख्येत अव्वल राहिला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, अकोला, परभणी व हिंगोली वगळता अन्य जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मुंबई, नाशिक, जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली व सांगली मिरज कुपवाड या महापालिका क्षेत्रातील मृतांची संख्या चिंताजनक आहे. 

या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्णयावर ठाकरे सरकारने सावध पवित्रा घेत अद्याप शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही. तत्पूर्वी, शाळा व्यवस्थापन समिती व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेतल्यानंतरच शाळा सुरु करण्याचा निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे.
त्यानुसार मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक घेऊन सप्टेंबरनंतर अधिकृत घोषणा करतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

सोलापूर शहर-जिल्ह्यात नववी ते बारावी या वर्गात दोन लाख 32 हजार विद्यार्थी शिकत आहेत. राज्य सरकारकडून काहीच आदेश नाहीत केंद्र सरकारने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्याबाबत काहीच आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे तुर्तास शाळा सुरु होणार नाहीत. 
- सुधा साळुंखे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Post a Comment

0 Comments