याच भटकत्या आत्म्याच्या बोटाला धरून राजकारणात आलात; शरद पवारांचा मोदींना टोला

 
पुणे |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा म्हटलं. मोदींच्या या टिकेला विरोधकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्याबद्दल काय बोलतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार बोलत होते. 

मोदींवर निशाणा साधताना शरद शरद पवार म्हणाले की, ईडीचा मी एक टक्काही वापर करत नाही, असं पंतप्रधान काल म्हणाले होते. पण जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काही म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जात आहात. माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्याबद्दल काय बोलतात? एक आत्मा भटकत आहे. त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, असं मोदी म्हणाले. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही, असे जोरदार प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.


राहुल गांधींवरील टीकेलाही पवारांकडून प्रत्युत्तर मोदींनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेचाही शरद पवार यांनी आजच्या सभेत समाचार घेतला. शरद पवार म्हणाले की, मोदी राहुल गांधींवर टीका करतात. साहबजादे क्या करेंगे? मोदींना कशी टीका करण्याआधी काहीतरी वाटायला हवं. राहुल गांधींच्या तीन पिढ्या देशासाठी झटल्या. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी झटल्या आहेत. गरिबी हटविण्यासाठी इंदिरा गांधींची हत्या झाली. आधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात साहबजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलत आहेत. खोट्या गोष्टी सांगतायत, चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करत आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे, असं आवाहन शरद पवार त्यांनी लोकांना केलं.

जे चांगले काम करतात, त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून कारवाई केली जाते. मुळात सत्ता ही जनहिताच्या कामासाठी करायची असते, याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, मात्र आता अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातो आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.

Post a Comment

0 Comments