‘सरकारमध्ये जा, मी राजीनामा देतो….’ अजित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट



कर्जत |

कर्जतमध्ये सुरू  असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांनीच सत्तेत सहभागी व्हावं असं सांगितलं होतं. तसेच आपण स्वत: राजीनामा देतो असंही पवार म्हणाले होते. विशेष म्हणजे देवगिरी येथील बैठकीला सुप्रिया सुळेंना बोलावून याबाबत कल्पना देण्यात आली होती. तसेच शरद पवार आपल्याला एक सांगत होते आणि करत मात्र वेगळेच होते असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?
कर्जत येथील शिबिरात पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, (latest politics news) अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ असे आम्ही 10-12 जण होतो. देवगिरी बंगल्यावर बसलो होतो. थेट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल म्हणून आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलावून घेतलं. सुप्रियाला सांगितलं की, लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो तेव्हा संघटना पुढे जाते. त्यावेळी सुप्रियाने काय सांगितलं तर मला 7 ते 10 दिवस द्या मी साहेबांना कन्विन्स करते. आम्ही 10 दिवस थांबलो. जयंत पाटील, अनिल देशमुख सुद्धा होते. पुन्हा आम्ही एकत्र बसलो की सरकारमध्ये गेलं पाहिजे. आमदारांच्या विकास कामांना स्थगिती मिळाली आहे, इतर अनेक प्रश्न आहेत, बहुजन समाजाचा विचार झाला पाहिजे वगैरे वगैरे… या सर्व गोष्टी करत असताना आम्ही पुन्हा थेट साहेबांकडे गेलो. साहेबांनी हे सर्व ऐकलं. ते म्हणाले ठीक आहे बघू आपण काय करायचं.

अजित पवार पुढे म्हणाले, वेळ जात होता… आम्ही म्हणालो वेळ जात आहे एकदा काय तो निर्णय घ्या. नंतर आम्हाला सांगितलं की, ठिक आहे. मला बोलावून सांगितलं की, आता सरकारमध्ये जा… मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. 1 मे होता आणि महाराष्ट्रदिनामुळे कार्यक्रम असतात. म्हणून 2 तारखेला पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. घरातील फक्त चौघांना राजीनामा देणार होते हे माहिती होतं. राजीनामा दिल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे वातावरण वेगळं झालं. त्यानंतर शरद पवार साहेब घरी गेले. त्यावेळी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली.

आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतलं. यांना सांगितलं की, उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक पाहिजेत. महिला, युवक हवे आहेत आणि त्यांनी तिथं आंदोलन करायंचं की, राजीनामा परत घ्या… परत घ्या… मला हे कळलंच नाही की हे का? जर राजीनामा द्यायचा नाही तर हे करायचं कशाला. ठराविकच लोकं होती. जितेंद्र आव्हाड सोडले तर एक आमदार सुद्धा नव्हता असंही अजित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी खरंच सात दिवसांची वेळ मागितली होती?
अजित पवार भाजपसोबत जाण्यापूर्वी देवगिरी बंगल्यावर जी बैठक झाली होती त्या बैठकीत तुम्ही सुद्धा होत्या. तुमच्या समोर सर्व चर्चा झाली आणि आठवडा भराचा वेळ द्या अशी चर्चा झाली होती असे अजित पवारांनी म्हटलं. यावर तुमची प्रतिक्रिया काय यावर एबीपी माझा वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बैठकीला मला बोलावलं नव्हतं. मी चर्चेतच नव्हतं. मी गेटक्रॅश केलं. मीडिया मला सांगत होती की शपथविधी आहे. मी विचारलं होतं पण मला कुणीही उत्तर दिलं नव्हतं. मी त्यांना विनम्र विनंती केली होती की, तुमचा जो प्रस्ताव आहे… मला सात दिवस त्या मी बाबांशी बोलून काय ते सांगते.

‘वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच जास्त लावतात, असा काहींचा अनुभव’
‘वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच जास्त लावतात, असा काहींचा अनुभव’ असंही अजित पवार म्हणाले यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो… मी कसं सांगणार. सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आणि छत्रपतींचा, शाहू-फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे.

Post a Comment

0 Comments