गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता भंडारा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही इथे घडली आहे. घरात झोपलेले असतानाच दोघांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
सुशील बोरकर (वय 46 वर्ष) आणि सरिता बोरकर (वय 42 वर्ष) अशी मृत पती-पत्नीची नावं आहेत. गुरुवारी रात्री बोरकर कुटुंब झोपी गेलं होतं. पती-पत्नी एका खोलीत झोपले होते. तर शेजारच्या दुसऱ्या खोलीत त्यांची दोन मुलं झोपली होती. याचवेळी हा सगळा थरार घडला.
शुक्रवारी सकाळी बराच वेळ घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती-पत्नी मृतावस्थेत पडलेले आढळून आले. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरु केला आहे. वर्ध्यात महिलेवर अॅसिड हल्ला वर्ध्यातूनही गुरुवारी रात्री एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली. गुरुवारी रात्री वर्ध्यातील प्रसिद्ध महावीर उद्यानात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानेच महिला सुरक्षा रक्षकावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला गेला. यात महिलेच्या गळ्यावर इजा झाली असून महिलेला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
0 Comments