महाराष्ट्रात होत नसलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी सरकारवर टीका केली. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही घरी बसावं. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि इच्छुक आमदारांना संधी मिळाली नाही, तर ते फुटून बाहेर पडतील, अशी भीती वाटत असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही का? असा सवालही अजित पवारांनी विचारला. अजित पवारांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
‘अजित पवारांना आता हे बोलावं लागेल, कारण ते आता विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या काळात 30-32 दिवस 5 मंत्री होते, हे त्यांना आता विसरायला लागेल,’ असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं. तसंच मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिलेले नसून न्यायीक प्रकरणांबाबतचे अधिकारच सचिवांना दिले आहेत, याआधी राज्यात आणि देशातही बऱ्याच ठिकाणी असं झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता, तुम्ही विचार करताय त्याच्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं उत्तर फडणवीसांनी दिलं. तसंच सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला नसल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टाने कुठेही मंत्रिमंडळ विस्तार करू नका, असं म्हणलेलं नाही, असं फडणवीस म्हणाले.
परिस्थिती महत्त्वाची
फ्रेंडशिप डेच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांनी एकत्र यावं, अशी मागणी केली जात आहे, यावर प्रतिक्रिया विचारली असता, कोण काय म्हणतं यापेक्षा परिस्थिती महत्त्वाची असते. कोण काय बोललं यावर उत्तर द्यायला मी रिकामा नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
आमची ताकद शिंदेंना
कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप बैठका घेत आहे, हा मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांचा आहे, या प्रश्नावर बोलताना आम्ही पक्ष मजबूत केला, तरी सगळी ताकद शिंदेंना देणार आहोत. लोकसभा निवडणुका भाजप-शिवसेना युतीमध्येच लढवल्या जातील, असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये पंतप्रधानांनी बोलावलेल्या निती आयोगाच्या बैठकीसाठी आले आहेत.
0 Comments