फळबागांचेही पंचनामे करण्याचे तहसिलदारांचे आदेश - आमदार राऊत


बार्शी - तालुक्यात मागील महिना-दीड महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. या शेती पिकांच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदनाद्वारे तालुक्यातील सर्व मंडळातील शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश करावे अशी मागणी केली होती.

या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ महसूल विभागाचे सचिव व जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन बार्शीतील सर्व दहा मंडळातील शेती पिकाचे नुकसान, घराची पडझड व इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले व त्यानुसार तहसीलदार महोदयांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी बार्शी तालुक्यातील नुकसान झालेल्या या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश पारित केल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.

शेती पिकाच्या पंचनामे आदेशानंतर १७ ऑगस्ट २०२२ रोजी तहसीलदार यांनी शेत पिकांमधीलच फळबागांच्याही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहितीही आमदार राऊत यांनी दिली. त्यामुळे आता अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले आहे त्यांचेही पंचनामे होणार आहेत.

Post a Comment

0 Comments