बार्शी/प्रतिनिधी:
मार्केट यार्डात लिलावासाठी भेंडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यास अडवून चाकूचा धाक दाखवून तिघाजणांनी लुटल्याची घटना बार्शीतील संतोषीमाता चौकात घडली.
सुहास रमेश शेळके (वय ३२) रा. बेलगांव, ता. बार्शी असे लुटले गेलेल्या शेतकऱ्याचे नांव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ जुलै रोजी पहाटे साडेतीनचे सुमारास मी माझ्या शेतातील भेंडी बार्शी मार्केट यार्डात लिलावाला घेऊन जाण्यासाठी मोटरसायकल वरुन एकटाच निघालो होतो. बार्शीतील जय संतोषीमात चौकात आल्यानंतर १८ ते ३० वयोगटातील तीन अनोळखी इसमांनी रस्त्यात आडवे उभे राहून माझी मोटरसायकल अडविली. एकाने माझ्या गळ्यातील उपरण्याने माझा गळा आवळला, तर दुसऱ्याने ओरडू नको नाहीतर खलास करेन म्हणून गळ्याला चाकू लावला जीव वाचविण्यासाठी मी चाकू लावलेल्या इसमाच्या हाताला हिसका मारला, त्यावेळी त्याने माझ्या अंगावर चाकूने वार केला, तो चुकवत असताना माझ्या पाठीवर लागून शर्ट फाटला व जखम झाली. तिसऱ्या इसमाने माझ्या पँटच्या खिशात हात घालून दोन हजार रुपये रोख व शर्टच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. त्यानंतर मी घाबरून पळत असताना तेथे जवळ असलेल्या लाकडी अड्डयावरील लाकडे पाठीवर फेकून मारली.
सुहास शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३४, ३९४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments