देवेंद्र फडणवीसांचे १८५७ च्या लढाईत योगदान असेल, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला


 बाबरी मशीद पडली  तेव्हा मी तिथे होतो, असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी करत शिवसेनेला डिवचले होते. यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता, आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. १८५७ च्या लढाईत फडणवीसांचे योगदान असेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडी विरोधात भाजपने पोल-खोल सभा घेतल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी बूस्टर डोस सभा घेत, शिवसेनेवर आगपाखड केली. तसेच बाबरी मशिद पाडल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. बाबरी मशीद शिवसेनेने नव्हे, तर भाजपच्या कारसेवकांनी पाडली. मी त्यावेळी हजर होतो, असा दावा केला. शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. बाबरीवरून दावे-प्रतिदावे, आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी पुन्हा झडत आहेत. मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केले. १८५७ च्या लढाईत फडणवीसांचे योगदान असेल, असा खोचक टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकार घरोघरी चुली पेटवत आहेत. मात्र, काही विरोधी पक्ष घर पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक हुशार आहेत, त्यांनी ओळखून घेतले आहे. आपण ही ओळखून घ्या, असे सांगत राज ठाकरेंना अप्रत्यक्ष चिमटा काढला. तसेच बाबरी मशीद पाडल्याचा दावा करणाऱ्या फडणवीसांचे १८५७ च्या लढाईत खूप योगदान आहे. मला त्यावर जास्त काही भाष्य करायचे नाही. या वादामध्ये जाण्यापेक्षा आता राम मंदिराचे निर्माण होत आहे. न्यायालयाने चांगला निर्णय दिला आहे. त्यापुढे जाऊन देशात बेरोजगारीचा प्रश्न आहे. वाढत्या महागाईवर राजकीय पक्षांनी बोलणे गरजेचे आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच महाविकास आघाडी सरकार एका बाजूला चांगली काम करत आहोत. विकासाची कामे सुरू आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Post a Comment

0 Comments