जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक दोन आठवड्यात जाहीर करा - सर्वोच्च न्यायालयाचे आदेश



 राज्य सरकारने लांबणीवर टाकलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर कराव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राज्य सरकारला हा खूप मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी विधेयक आणून निवडणुकांच्या तारखा स्वतः जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. 


ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने नवीन आयोग नेमला आणि आयोगामार्फत डाटा गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम कधी होणार याबाबत अद्याप स्पष्ट नसल्याने निवडणुकांच्या तारखा राज्य सरकारने जाहीर केलेल्या नाहीत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने दोन आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर कराव्यात, असे निर्देश दिल्याने सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे.


सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पूर्णपणे हातात आल्यानंतर त्याची कारणमीमांसा बघितल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे. मात्र निवडणुका कराव्यात असा त्यांनी आदेश दिला आहे असे मी आत्ताच ऐकले आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून तर राज्य सरकारने कायद्यात काही बदल केले. आता सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे. ज्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांची मुदत संपली आहे त्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे, असे वाटते. निर्णय हाती आल्यानंतरच याबाबत आम्ही आमची भूमिका घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments