शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. जाईल तिथे आग लावायची एवढेच त्यांचे राज्यात काम आहे. त्यांचे आयुष्य आग लावण्यामध्येच गेले आहे. त्यामुळे त्यांचे पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' असे करावे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खोत यांनी शरद पवार यांच्याावर सडकून टीका केली.
सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना सदाभाऊंनी पवारांवर तोफ डागली. ते म्हणाले, जाईल तिथे पवार साहेब काड्या लावण्याचे काम करत असतात. खरंतर ते महान नेते आहेत. मात्र, एकीकडे आग लावल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच्या घराला आग लावायला निघून जायचे. त्यांचे आयुष्यच आग लावण्यामध्येच गेले. त्यामुळे पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' असे करावे.
राज्यातील शेतकऱ्यांची वीज कापायला कोणी येत असेल तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता दांडके असतील आणि त्याने सोलून काढले जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी महावितरणला दिला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने आता शेतकऱ्यांना 'वीजबिल माफी द्यावी लागेल अशी अपेक्षा सदाभाऊंनी व्यक्त केली आहे.
0 Comments