इंदापूर/प्रतिनिधी:
महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्षे उलटली. या काळात सरकारमधील प्रमुख आणि चर्चेतील चेहरे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,शिवसेना खासदार संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अशा ठराविक नेत्यांची नावं आपल्याला घेता येतील. मात्र, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्याराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. महत्वाची बाब म्हणजे भर सभेत दत्तामामांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाच मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलाय! जेव्हा स्टेजवर उपस्थित असलेल्यांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा मात्र त्यांनी आपली चूक सुधारली.
आज इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. तसंच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात करताना राज्यमंत्री भरणे यांना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ दत्तामामांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर दत्तामामांनीही आपली चूक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला. मात्र, दत्तामामा यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानं उपस्थितांमध्ये काही काळ खळबळ आणि हशाही पिकला! तेव्हा भरणे यांनी सतत डोक्यात खूप विचार सुरु असल्याने होतं असं कधीकधी, असं म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत. असं असुनही त्यांना मुख्यमंत्र्याच्या नावाचा विसर पडला. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी शोकांतिका असल्याची चर्चा इंदापूरच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दत्तामामा इंदापूरचे आमदार होते आणि त्यावेळी फडणवीसांनी इंदापूरसाठी विकासनिधी देताना कायम हात सैल ठेवला होता. त्यामुळेच भरणेंच्या तोंडी आजही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव आलं, अशीही चर्चा खासगीत रंगत आहे. तर दुसरीकडे माणूस आहे, त्यात दत्तामामांच्या मागे मोठा व्याप आहे. त्यामुळे झाली असेल चूक, असंही इंदापुरातील लोक म्हणत आहेत.
0 Comments