देशातील वातावरण निवडणुकामुळे चांगलेच तापलं आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जणू सेमीफायनलच आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. पंजाबमध्ये येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यातच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निवडणुकीत एन्ट्री मारल्याचे दिसून येत आहे. आज एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा असल्याचे ते म्हणाले. तसेच 'कमी बोललो, पण काम जास्त केले', असेही त्यांनी म्हटलं.
डॉ.सिंग यांनीही चीनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. गेल्या एक वर्षापासून चिनी सैन्य भारताच्या भूमीवर ठाण मांडून बसले आहे. या सरकारचा संविधानावर विश्वास नाही. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. सरकार केवळ देशातच नाही तर परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले.
सध्याची देशातील परिस्थिती चिंताजनक असून कोरोना काळातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. तर दुसरीकडे 7 वर्षे सरकार चालवूनही केंद्र सरकार आपल्या चुका मान्य करत नसल्याचे दिसत आहे. आज लोकांना ज्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी ते देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत, असे मनमोहन सिंग यांनी म्हटलं.
पंतप्रधानपदाला एक वेगळी गरिमा असते. प्रत्येकवेळी इतिहासाला दोष देऊन तुमचे पाप कमी होत नाहीत. पंतप्रधान म्हणून कार्य बजावताना मी जास्त बोलण्याऐवजी कामाला प्राधान्य दिले. कधीच राजकीय फायद्यासाठी देशाचे विभाजन केले नाही. तसेच सत्य झाकण्याचाही कधीही प्रयत्न केला नाही, असे सिंग यांनी सांगितले.
भारताच्या पवित्र भूमीवर गेल्या एक वर्षापासून चिनी सैन्य ठाण मांडून आहे. हे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेजारील देशांसोबतचे आपले संबंध बिघडले असून जुने मित्र आपल्या सोडत आहेत. बळजबरीने मिठी मारणे, दौरे करणे, निमंत्रण नसताना बिर्याणी खायला जाणे, या आशा गोष्टींमुळे देशाचे संबंध सुधरत नाहीत, हेही सरकारने समजून घेतले पाहिजे, अशा कडक शब्दात सिंग यांनी मोदींवर टीका केली.
गेल्या काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या नावाखाली पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि तेथील लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ते योग्य नव्हते. तसेच शेतकरी आंदोलनाच्या काळातही पंजाबला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. पंजाबींच्या शोर्य, देशभक्ती आणि बलिदानाचा सर्व जगाने सन्मान केला असून सलाम केला. त्यांच्याबाबत जे काही घडले, ते पाहून पंजाबच्या मातीत जन्मलेला एक सच्चा देशवासी या नात्याने मला अपार दु:ख झाल्याचे सिंग यांनी सांगितले.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिलांना त्रास होत आहे. देशात सामाजिक विषमता वाढली असून लोकांवरील कर्ज वाढत चालले आहे. तर उत्पन्न कमी होत आहे. श्रीमंत व्यक्ती हा अधिक श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब व्यक्ती अधिक गरीब होत आहे. तर सरकार आकडेवारीशी खेळ करून सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत आहे, असे सिंग यांनी म्हटलं.
निवडणुकीच्या वातावरणात सध्या पंजाबमधील जनतेसमोर मोठी आव्हाने आहेत. त्याचा योग्य मुकाबला करणे महत्त्वाचे आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांची समृद्धी आणि बेरोजगारी केवळ काँग्रेसच दूर करू शकते, हे पंजाबच्या मतदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. भारत आज एका गंभीर वळणावर उभा आहे. मला पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर येथील माझ्या बंधू-भगिनींसोबत देशातील आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्याची खूप इच्छा होती. पण, प्रकृती कारणास्तव मी या माध्यमातून संवाद साधत असल्याचेही त्यांनी म्हटलं.
0 Comments