अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आहे. लागली आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू रुग्णालयात ही आग लागली असून ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयसीयू वॉर्डात ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण २० रुग्ण उपचार घेत होते.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यासोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात केली.
ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डाला लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तर १३ ते १४ रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळाचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.
ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वॉर्डला आपल्या विळख्यात घेतले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत. तसेच मदत आणि बचावकार्यही मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी अहमदनगर महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम देखील दाखल झाली आहे.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप दाखल असून त्यांनीही घटनेची माहिती घेतली. ही आग कशामुळे लागली, तसेच रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते की नाही याबाबत चौकशी करण्यात यावी असंही संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.
0 Comments