परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका युवकाने लग्न होत नसल्याच्या कारणातून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. युवकाने आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. भागवत आसाराम टगुळे असं आत्महत्या केलेल्या २३ वर्षीय युवकाचं नाव आहे. मृत भागवत टगुळे हा मानवत तालुक्यातील बोंदरवाडी येथील रहिवासी आहे. त्याने आपल्या राहत्या घरातील लाकडी अडूला साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. हरिभाऊ टगुळे यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत भागवत याने गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या आई वडिलांकडे लग्नासाठी तगादा लावला होता. अनेक स्थळं पाहूनही त्याचं लग्न जुळत नव्हतं. तसेच त्याला मनासारखी मुलगी मिळत नव्हती. त्यामुळे भागवतला मानसिक तणाव आला होता. नैराश्यात गेलेल्या भागवत याने सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, मानपत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून हरिभाऊ टगुळे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. एवढ्या कमी वयात तरुणाने अशाप्रकारे अचानक आयुष्याचा शेवट केल्याने कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments