बार्शी! खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांना बि-बियाणे, खते कमी पडू नयेत - आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत


बार्शी/प्रतिनिधी:

आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी सन २०२१ - २२ या शेतीच्या खरीप हंगाम पूर्वची आढावा बैठक, बार्शी तालुक्याच्या कृषी विभागाचे सर्व अधिकारी व खत विक्रेते यांच्या सोबत बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतली.

 या बैठकीत तालुक्यातील  एकूण भौगोलिक क्षेत्र, त्याचप्रमाणे खरीप हंगामाच्या लागवडीलायकचे एकूण क्षेत्र, खरीप सरासरी क्षेत्र, भाजीपाला, फळबागा लागवडीचे क्षेत्र, एकूण खातेदार व खरीप गावांची संख्या, सन २०२०-२१- यामध्ये झालेला सरासरी पाऊस या सर्व गोष्टींची माहिती घेऊन, सध्यस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.

 कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती बि-बियाणे, खते व कीटकनाशके यांची उपलब्धता करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या. या बैठकीत सोयाबीन, तुर, नविन लाल तूर, उडीद व कांद्याची लागवड याबाबतही प्रमुख्याने चर्चा करण्यात आली‌.

 सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन असल्याने, पहिला पाऊस झाल्यानंतर बाजारात खते,बि-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. होणारी ही गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने खते विक्रेत्यांनी त्यांच्या संपर्कातील नेहमीच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून कशा पद्धतीने खते व बि-बियाणे वाटप करावयाचे याबाबत चर्चा झाली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन बी-बियाणे,खते वाटप करण्याचे नियोजन खत विक्रेते व कृषी विभागाचे अधिकारी यांनी समन्वय साधून करावे अशा सूचनाही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या.

आ. राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पीक वान बदल, जास्त उत्पादन देणारे वाण, खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन यांबाबतही चर्चा केली. 

बार्शी तालुक्यातील वाढणाऱ्या फळबागा यामध्ये प्रामुख्याने सीताफळ, आंबा, द्राक्ष, भाजीपाला प्रतवारी करणे, प्रक्रिया उद्योग, तयार शेतमाल साठवणीसाठी गोदामांची शीतसाखळी, कोल्ड स्टोरेज तयार करणे या विषयावर सविस्तर चर्चा करून शेतीसाठी आवश्यक प्रकल्प उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आ. राजेंद्र राऊत यांनी दिली.

या बैठकीत तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांना आवश्यक तेवढे खते व बि-बियाणे, किटकनाशके उपलब्ध करून दिले जातील, याची निश्चित काळजी घेतली जाईल असे आश्वासन आ.राजेंद्र राऊत यांना दिले.  

येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व शेतकरी बांधवांना आ. राजेंद्र राऊत व कृषी विभागाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

 या आढावा बैठकीस पंचायत समितीचे सभापती अनिल  डिसले, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, मंडळ कृषी अधिकारी दिलीप राऊत, कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे , कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील, बाळासाहेब चापले, विलास मिस्कीन, सुधीर काशीद, भारत दाईंगडे, खत विक्रेते राहुल मुंढे, उमेश चव्हाण, बप्पा कोकाटे, नाना मते आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments