“पंतप्रधान कार्यालय काही कामाचं नाही, करोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्या”; सुब्रमण्यम स्वामी


 भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत राहतात. सत्ताधारी पक्षात असून देखील सरकारवर टीका करायला ते कधीच मागेपुढे पाहत नाहीत याचीच प्रचीती अनेकवेळा येते. सध्या देधात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत.कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला घरचा आहेर दिलाय. 

पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या करोना माहमारीच्या काळामध्ये काहीच कामाचं नसून सध्याची करोना परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केलीय. स्वामी यांनी सध्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचं काम मोकळेपणाने करु दिलं जात नसल्याचं म्हटलं आहे.

 “ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या करोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments