सुशिलकुमारचे 'अ' सुशिल कांड!


भारताला दोन ऑलिंपिकची पदकं त्याने अपार लढून आणली.देशातल्या प्रत्येक कुस्तीगीराचा तो आयडॉल ठरला.तसा माझा ही होता ; काही एक वर्ष. होय, सुशिल कुमार बद्दल बोलतोय मी.ज्याला देशानं बक्षिसानं मडवलं.सरकारनं मान,सन्मानाने पुरस्कार दिले.आज त्याच सुशिल कुमारवर बक्षिस लावलं गेलं. कुणी ? तर दिल्ली पोलिसांनी.का ? तर एका ज्युनिअर मल्लांच्या हत्येचा त्यावर आरोप आहे.अन् तो गेल्या वीस दिवसापासुन फरार होता.दिल्ली पोलिस त्याच्या मागावर होते.तो परदेशी पळून जाऊ नये म्हणुन त्याचं पासपोर्ट ही गोठवलं गेलं.त्याची माहिती देणाऱ्याराला पोलिसांनी बक्षिस जाहिर केलं.किती मोठ्ठं हे दुर्दैव अन् नामुष्की म्हणावी लागेल.

या घटनेनं मी हादरलो,मला धक्का बसला असं काय घडलं नाही.कारण हे कधी ना कधी घडणारचं होतं.सुशिलचं अती त्याला भोवणार होतच.

काल जागतिक कुस्ती दिवस.अनेकांचे शुभेच्छांचे मेसेज येत होते.तोवर बंदुकधाऱ्या पोलिसांच्या गराड्यात टॉवेलने तोंड झाकुन ताब्यात घेतलेला सुशिलकुमार दिसला.अन् लाजिरवाणं वाटलं.संताप ही वाटला.कुस्तीनं बळ,मान,सन्मान ऐश्वर्य दिलं अन् त्याने त्याची माती केली.सुशिलच्या खेळाबद्दल,त्याच्या गुणवत्तेबाबत शंका नाहीच मुळी.त्याची खेळातली आक्रमकता,बचावात्मकता त्याची डावबाजी अन् कित्येक वर्षे त्याचं खेळातलं सातत्य या जोरावरच त्यानं सर्व यश आपलसं केलं.बाकी सतपाल सारख्या खुप जाणत्या वस्तादाचा तो पठ्ठा.त्यांनी त्याला जावाई ही करुन घेतला.सतपालांनी सुशिलला मनगटाने घडवलं खरं पण आदर्श मुल्यांची सक्ती मात्र त्यांनी अलिकडे सैल केली.आणि इथेच सुरु झाला वर्चस्वशाली,दबंग,धतींग करणाऱ्या सुशिलकुमारचा प्रवास.अलीकडच्या दशकात आपल्याला माध्यमाद्वारे दिसणारा शांत,आदर्श,नम्र, स्वज्वळ सुशिलकुमार नव्हताच मुळी.छत्रसाल स्टेडीयमवर आपलं वर्चस्व,सत्ता राहावी या उद्देशाने त्यांने परिसरात कायम आपला दरारा ठेवला.अनेकांना,अगदी तिथे सरावाला असणाऱ्या मल्लांना ही त्याने पिस्तुलने धमकावलं आहे.त्याच्या या सर्व वागण्याला गुरु,सासरे यांची मुकसंमती होतीच म्हणा; तरीच तो या वर्चस्वशाली भुमिकेत वावरत आला. शेवटी याच वागण्यातून त्याच्या कडून हा गुन्हा घडला असावा.

सतपालचं मार्गदर्शन मिळेल.सुशिलकुमार ही तिथेच प्रशिक्षण देतोय या जमेच्या गोष्टींसाठी महाराष्ट्रातील अनेक युवा मल्लांनी या काही वर्षात दिल्लीचं छत्रसाल स्टेडीयम गाठलं पण त्यांना तिथे कायम दुय्यम अन् दबावाखालील वागणूक मिळालेली उदाहरणे आहेत.त्यांनी नेहमी महाराष्ट्राचा मल्ल अन्यायी भुमिकेने वागवला.नरसिंग यादववर डोपिंग मध्ये अडकवलं. कशा पद्धतीने अन्याय केला गेला हे सर्वाना ठावुकच आहे

सुशिलचे गुरु आणि सासरे या 'सतपाल' नावाच्या गृहस्थाला महाराष्ट्रा खुप प्रेम,मान,सन्मान,धन ही दिलं.कारण महाराष्ट्राच्या कुस्तीशौकींनांनी चांगल्या मल्लांची नेहमी कदर केली.अगदी पाकिस्तानच्या मल्लांना देखील मोठ्ठा मनाने संभाळणारी माणसं महाराष्ट्रात आहेत.पण उत्तर भारताने राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय नियोजनाच्या कुस्तीवर आपलं वर्चस्व ठेवत महाराष्ट्राच्या अनेक गुणवंत मल्लांवर अन्याय केला याची ताजी उदाहरणें आहे.सतपालच्या कुस्तीचा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्रातील अनेक बापांनी आपल्या पोरांचं नाव 'सतपाल' असं ठेवलं.का तर हा पोरगा पण तसाच मोठ्ठा पैलवान घडावा.पण सतपाल नावाची  कपटी वृत्ती महाराष्ट्राला नेहमी मारक ठरली.

पैलवान अशा हिसेंकडे,गुन्ह्याकडे का वळतात ? तर यामागे मानसशास्त्रीय,आर्थिक तसेत राजकिय कारणं दडली आहेत.पैलवान गुंडगिरी करतात.ते उर्मट असतात.मंद बुध्दी असतात.असे अनेक आरोप सामान्यांकडून केले जातात.आता सुशिलने केलेल्या कांड मुळे.या प्रश्नांना अधिकच फुंकर घातली जातेय.

पण प्रथम हे क्षेत्र समजुन घेणं गरजेचं आहे.कुस्ती हा कष्ट अन् बळावर आधारलेला खेळ.मग या खेळाला बुद्धीची गरज नाही का? तर असं मुळीच नाही.जो चाणाक्ष अन् बुद्धीमान तोच खरा पैलवान.पैलवान हा एकमेव प्राणी आहे जो विजेच्या चपळाईने हालचाल करतो.मग मल्लांमध्ये आडमुठेपणाचा शिरकाव कसा होतो? तर पैलवानकीची विशिष्ट अशी आचारसंहिता आहे.तालमीच्या बाहेर न पडता फक्त कुस्ती हेच सर्वस्व माननं.याच कालखंडात त्याचा समाजाशी,अगदी कुटुंबाशी ही काही प्रमाणात बंध तुटतो.त्यात शिक्षणाचा अभाव.यामुळे त्यांची सामाजिक जडणघडण थांबते.जेव्हा त्याची कुस्ती,तालीम सुटते तेव्हा पुढेचे काही भवितव्य उरलेले नसते.तेव्हा राजकारणी, त्याला हेरतात.स्वतःच्या फायद्यासाठी,पाठबळासाठी त्याचं पद्धतशीर शोषण करतात.पैलवान म्हणुन मिळत असलेल्या माना पानाला तो वर्चस्व समजायला लागतो अन् तिथेच त्याची वाट गंभीर गुन्ह्यांकडे वळते.पुढे सत्ता वर्चस्वाच्या वादातून शेवट ही वाईट होतो.याची उदाहरणे पश्चिम महाराष्ट्राने पाहिली आहेत.वाळू व्यवसाय,रिअल इस्टेट,बाजारपेठा,सुरक्षा अशा अनेक ठिकाणी माजी मल्लांनी आपली ठेकेदारी सुरु केली आहे.हा व्यवसाय करताना अनेकांनी आपल्या बळाचा वापर केला आहे. हे स्पष्ट आहे.त्यांना ते भोगावं ही लागते.शेवटी कायद्या पुढे कोणीच मोठा नाही.

आता सर्वच मल्लांना या रांगेत बसवावं का तर ते चुकीचं ठरेल.माझ्या घरातील उदाहरण माझं घरदार,माझं मामाकडचं घरदार जातीवंत पैलवानांचं घराणं.मामा अस्लम काझी यांनी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती क्षेत्रावर सलग बारा वर्ष अधिराज्य गाजवलं.लाखा कुस्तीप्रेमींच्या तोंडी अस्लम काझी हे नाव आहे.त्यांनी ५१ चांदीच्या गदा जिंकत एक विक्रम केला.पण मी त्यांना कधी कोणावर दादागिरी करताना पाहिलं नाही अथवा ऐकलं नाही.त्यामुळे त्यांना महाराष्ट्र मानतो.मी,भाऊ कित्येक वर्ष पैलवानकीत होतो.महाराष्ट्र भर फिरणं असायचं पण कुणावर हात उगारणं लांब पण कुणाला शिवी ही दिल्याचं,भांडण केल्याच आठवत नाही.मल्लविद्या ही नम्रता,नितिमत्ता,विवेक,प्रामाणिकता,कष्ट,संघर्ष शिकवते.जो व्यक्ती हे सुत्र शेवट प्रयत्न पाळतो तोच खरा पैलवान!

पैलवान ही माणुस आहे.त्याला राग,सणक आहे.सहसा तो कोणाच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करत नाही. परंतू त्याला कोणी डिवचले तर पुढे त्याचं वेगळे रुप असतं हे ही खरं आहे.भारतीय स्वातंत्र्यात पैलवानांचं योगदान मोठ्ठ राहिलं आहे.'चले जाव' ही स्वातंत्र चळवळीला मल्लांचं खुप मोठ्ठ बळ होतं.त्यांच्या विद्रोहाची रुपे अनेक आहेत.अलीकडच्या मल्लविद्येच्या गुरुकुल पद्धतीत वस्ताद मल्ल घडवताना मनगटा बरोबर मनाची मशागत करण्यात कमी पडत आहेत.सध्या संस्कारक्षम मल्ल घडवण्याचे मोठे आव्हान आहे.

परंतु अंगातली मस्ती वाईट असते.ती कायम गुरगुरते अन् हिंसेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.जो पैलवान ती मस्ती पचवतो तोच खरा आदर्श मल्ल म्हणुन समाजात वावरतो. अथवा असाच अनेकांचा सुशिल कुमार होतो.

बाकी सुशिलकुमार आपलं सर्व राजकीय वजन वापरुन या गुन्हातून स्वतःस सोडवण्याचा प्रयत्न करेल, पण त्याच्यावर चार्ज शिट फाईल होताच.त्याची सर्व पदके,सन्मान,पुरस्कार काढुन घ्यायला हवीत.तरच त्या हिंसेच्या वाट्याला न जाण्याचा धडा अनेकांना मिळेल.

            ✍🏻 मतीन शेख. ९७३०१२१२४६( फेसबुक वरून साभार)

Post a Comment

0 Comments