देशभरात लॉकडाउन लागेल का? केंद्र सरकारने दिले उत्तर



 देशात करोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. ऑक्सिजन आणि औषधांचाही तुटवडा आहे. यामुळे आता संपूर्ण देशात लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न विचारला जातोय. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी  या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुढच्या काळात आणखी कडक उपाययोजनांची गरज पडली तर त्यावर आधी चर्चा केली जाईल, असं पॉल म्हणाले.

राज्यांना रात्रीच्या संचारबंदीचा सल्ला

संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंध लावले जाऊ शकतात. नागरिकांच्या वाहतुकीवर बंधनं आणली जातात. यासंबंधी २९ एप्रिलला केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या भागात संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे तिथे रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना दिली गेली आहे. याचा निर्णय राज्य सरकारे (Governments) घेतली. याशिवाय सामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालावी. शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडा संकुल, स्विमिंग पूल आणि धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं पॉल म्हणाले.

राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना

स्थानिक परिस्थितीचे आकलन करून राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी त्या स्थितीनुसार निर्णय घ्यावा. या मार्गदर्शक सूचनेच्या आधारावर राज्य सरकारे निर्णय घेत आहेत. या मार्गदर्शक सूचनांशिवाय आणखी काही गरज पडत असेल तर त्या पर्यायांवरही विचार केला जातो. संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारांना आधीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, असं पॉल यांनी स्पष्ट केलं.

हिमाचल प्रदेशात १० दिवसांचा लॉकडाउन

हिमाचल प्रदेशात सरकारने बुधवारी १० दिवसांचा लॉकडाउन (Lockdown) घोषित केला. ७ मे ते १६ मेपर्यंत हा लॉकडाउन असेल. गुरुवारी मध्यरात्रीपासून हा लॉकडाउन लागू होईल. दरम्यान, उत्तर प्रदेशात १० मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. यामुळे सोमवारी सकाळपर्यंत निर्बंध लागू राहतील.



Post a Comment

0 Comments