उस्मानाबाद! मराठवाड्यात उस्मानाबादचा सर्वाधिक २.४० टक्के मृत्युदर


जिल्ह्यात काेरोनाची परिस्थिती चिंताजनक बनत असून, मराठवाड्यात सर्वाधिक २.४० टक्के इतका मृत्युदर आहे. गेल्या आठवड्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याबरोबर चर्चा करून जिल्ह्यात तातडीने, जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली होती. आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे जावई म्हणून परिस्थितीत दिलासा देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या विषयावर तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एका पत्राद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

आमदार पाटील यांनी सोमवारी यासंदर्भातील पत्र टोपे यांना पाठविले असून, त्यात प्रशासनाच्या आकडेवारीचा संदर्भ देत जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत रूग्ण व मृत्यूची परिस्थिती स्थिती मांडली आहे. पत्रात म्हटले आहे की, आपण १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणांची आढावा बैठक घेतली होती. १० मे रोजी कोरोनाने जिल्ह्यात भयावह रूप धारण केले असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासह आरोग्य यंत्रणेस नियोजनबद्ध उपाययोजना आखून देणे गरजेचे आहे. उपलब्ध आकडेवारी प्रमाणे जिल्ह्यात आजमितीला एकूण बाधित रुग्णसंख्या ४५,४३१ झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,२७७ आहे. कालपर्यंत जिल्ह्यात १,०७७ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जिल्हा रुग्णालयातून दिलेल्या माहितीप्रमाणे जिल्हाभरात आजपर्यंत तपासलेल्या २,४३,३४७ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ४४,६९८ (३४.४८%) नमुने पॉझिटिव्ह आले. रविवारी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या आटीपीसीआर चाचणीच्या ६२१ ग्राह्य अहवालामधील ३११ नमुने ( ५०%) पॉझिटिव्ह आले तर रॅपिड अॅटीजेन टेस्ट अंतर्गत १,५२६ पैकी ४०१ नमुने (२६ %) पॉजिटिव्ह आले, असे एका दिवसात ७१२ नवीन रुग्ण सापडले आहेत.

१६ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात दिवसाला केवळ २ ते ३००० चाचण्या केल्या जात असल्यामुळे संक्रमित झालेले नागरिक वेळेत सापडणे शक्य होत नाही. त्यामुळे इतरांना संक्रमणाचा धोका वाढत आहे. वरचे वर रुग्ण संखेत वाढ होण्याची शक्यता आहे.अत्यवस्थ झालेल्या रुग्णांचा प्राधान्याने उपचार हा जिल्हा सामान्य रुग्णालयात केला जातो. जिल्ह्यात इतर मोठे खासगी रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने हा भार जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडतो. निकषानुसार व प्रत्यक्षात काम करतांना लागणारे तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त २.४०% मृत्युदर आहे व प्रति लाख लोकसंखेमागे ६५ मृत्यू हा ही दुर्दैवी उच्चांकी आकडा आहे. प्रशासनाच्याच आकडेवारीचे अवलोकन केले तर परिस्थितीचे तुलनात्मक गांभीर्य स्पष्ट होत आहे.

मृत्युदर विचारात घेऊन नियोजन आवश्यक
सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या बरोबर गेल्या आठवड्यात सविस्तर चर्चा करून विषयाचे गांभीर्य सांगत जिल्ह्यात तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली होती. राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री व मराठवाड्याचे सुपुत्र आणि उस्मानाबादचे जावई म्हणून आपण देखील हा विषय अतिशय गांभीर्याने घ्याल ही अपेक्षा आहे. उपरोक्त बाबींचा सर्वंकष विचार करून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी व उच्चांकी मृत्यू दर लक्षात घेता तातडीने आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यात बैठक घ्यावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments