प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
शिरोळ तालुक्यातील ३ शिवभोजन केंद्रावर गरीब, कष्टकरी व वंचित गरजू घटकांना शिव भोजन थाळीच्या माध्यमातून मोफत व उत्तम गुणवत्तेचे अन्न मिळत असल्याने गरीब व गरजू लोकांनी या विषयी समाधान व्यक्त केले.
महाविकास आघाडीच्या मोजक्या महत्वकांक्षी योजनांपैकी पैकी गरीब व गरजू लोकांना स्वस्त व सवलतीच्या दरात (₹ १०/) शिवभोजन थाळी मिळावी या हेतूने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवभोजन थाळीची सुरुवात १ जानेवारी २०२० पासून सुरू केली. या शिव भोजन थाळी मध्ये २चपाती,१ मुद भात, १ वाटी भाजी व १ वाटी वरण असे पदार्थ त्यामध्ये आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर किमान ७५ थाळी व कमाल १५० थाळीची शासनाकडून मंजुरी होती. तसेच ह्या शिवभोजन केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी कार्यालय, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक व गजबजलेल्या ठिकाणी या केंद्राला परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोना संकटाच्या काळात या थाळीचे दर ₹ १० वरून ₹५ करण्यात आले.
सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या शिवभोजन थाळी बद्दल विरोधी पक्ष व अन्य घटकाकडून उलट सुलट चर्चा करून त्याची थट्टा करण्यात आली होती. त्यांच्या मते ही शिवभोजन थाळी म्हणजे एक प्रकारचा फार्स असून ती कागदोपत्री थाळी आहे. मात्र उद्धवजी ठाकरे सरकारने शिवभोजन थाळी प्रत्यक्षात गरीब व गरजू घटकांची थाळी बनवली आहे अशा प्रकारचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे.
खरं म्हणजे या शिवभोजन थाळी ला जवळपास १ वर्ष ३ महिने पूर्ण झाले असून लाभार्थ्यांकडून या थाळीविषयी समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे. या थाळीने असंख्य गरीब व गरजू घटकांना तारलेले आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना महामारीच्या या भयावह संकटात या थाळीने खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांना आनंद मिळवून दिला आहे.
शिरोळ तालुक्यात एकूण ३ शिवभोजन केंद्र असून या केंद्राच्या माध्यमातून शिवभोजन व्यवस्था किमान ७५ लाभार्थ्यांना केलेली होती. तसेच ठाकरे सरकारच्या निर्णयानुसार आज शनिवार दि.१७ एप्रिल २०२१ पासून मोफत ११३ शिवभोजन थाळी प्रती केंद्रनिहाय देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मी स्वतः प्रत्यक्षात राजलक्ष्मी भोजनालय हॉटेल माऊली शिरोळ, व जुगळे मेस कुरुंदवाड या तिन्ही शिवभोजन केंद्रांना भेट देऊन ही केंद्रे प्रत्यक्षात नियमाप्रमाणे सुरू आहेत का? लाभार्थी नेमके कोण आहेत ? याची शहानिशा केली असता प्रत्यक्षात या केंद्रावर शासन नियमाप्रमाणे गरीब व गरजू लाभार्थी असून त्यांना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. तसेच या तिन्ही केंद्रामध्ये नीटनेटकेपणा, स्वच्छता व शिव भोजनाथाळी ही उत्तम गुणवतेच्या मेन्युनी भरलेली होती. तसेच या तिन्ही केंद्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या कोव्हीड-१९ नियमांना अधीन राहून या शिवभोजन थाळीचे वितरण केले जात होते.
या लाभार्थ्यांकडून या शिवभोजन थाळी विषयी प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात होते.तसेच प्रत्यक्षात या घटकाकडून उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानण्यात येत होते. या शिवभोजन थाळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही थाळी सर्व गरजू घटकांना फायद्याची ठरली असून मुख्यमंत्री मा.ठाकरे यांची ही महत्वाकांशी योजना यशस्वी ठरली असल्याचे प्रतिक्रिया लाभार्थ्यांकडून मिळत आहे.
0 Comments