"आधी हिंदूह्रदयसम्राट… आता फक्त उद्धवजींचे वडील?"


देश करोना संकटाला तोंड देत असतानाच नवीन संसद भवनाचं काम केंद्राकडून सुरू ठेवण्यात आलं आहे. त्यावरून आता प्रश्न उपस्थित होत असून, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार  यांनीही नव्या संसद भवनावरून भूमिका मांडली. त्याला भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं. भातखळकरांनी दिलेल्या उत्तराला आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून रोहित पवारांनी भातखळकरांना टोला लगावला आहे.

करोना काळात सुरू असलेल्या नव्या संसद भवनाच्या कामावर रोहित पवारांनी टीका केली होती. सध्या देशाची प्राथमिकता काय याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं असताना राज्य आर्थिक भार उचलत आहेत, तर केंद्र सरकार सेंट्रल विस्टा (नवीन संसद भवन) प्रकल्पाचा भार उचलत असून, हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही असं रोहित पवार म्हणाले. त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं होतं. पवार आणि भातखळकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून, रोहित पवारांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

“युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच. संसद निश्चित महत्वाची आहे, पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याने सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडं वळवणं गरजेचं असतांना करोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचं काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी?,” असा सवाल रोहित पवारांनी भातखळकर यांना केला आहे. 

“केंद्र सरकारने यंदा आपले हक्काचे GSTचे २०८३३ कोटी रुपये बुडवले. २४ ते ३० एप्रिलसाठी ४.३४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा करूनही राज्याला कालपर्यंत केवळ २.२४ लाख इंजेक्शन्स मिळाले. महाराष्ट्राची कोंडी होत असताना आपण मात्र मौन बाळगता! आपला मराठी बाणा दिल्लीसमोर झुकला की काय?,” असा टोलाही रोहित पवार यांनी भातखळकर  यांना लगावला.

“राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्याने लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही. देशमुख साहेबांबाबत बोलायचं तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी पूर्ण होऊद्या. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तोवर थोडा धीर धरत राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल. राजकीय वक्तव्य करण्याची ही वेळ नाही. इथं लोकांचे प्राण पणाला लागले आहेत हे विसरू नका!,” असा सल्ला रोहित पवारांनी भातखळकर यांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments