ग्रामपंचायती जिल्हा परिषदा झाल्या मालामाल ; भरीव निधी देण्याची हसन मुश्रीफांची घोषणा


 ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना भरीव निधी देणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. पंधराव्या वित्त आयोगातून आणखीन १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा अबंधीत (अनटाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात आला असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येणार आहे.

(Advertise)

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकुण ५,८२७ कोटी रूपये निधी मंजूर आहे. यापैकी यापुर्वी १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा अबंधीत निधी तसेच १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी असा एकूण २,९१३ कोटी ५० लाख रुपये इतका निधी पहिल्या हप्त्यापोटी प्राप्त झाला होता. हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना विकास कामांवर खर्च करण्यासाठी यापुर्वीच वितरीत करण्यात आला आहे. 

(Advertise)

आता दुसऱ्या हप्त्यापोटी १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा अबंधीत निधी प्राप्त झाला असून तो जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात आला आहे. तेथून पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना हा निधी तत्काळ वितरीत करण्यात येईल. पंधराव्या वित्त आयोगातून आतापर्यंत ४,३७० कोटी २५ लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments