वसईमध्ये पोलिसांनी कारवाई करताना मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. 'वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक काय आहेत हे दाखवून देऊ', असं आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलं आहे.
संदीप देशपांडे यांनी म्हटलं की,“आमचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करत असताना हात उचलणारे पोलीस आम्ही पाहिले. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होते. सरकारचे दलाल असल्यासारखं पोलिसांनी वागू नये. सत्ता येते आणि सत्ता जाते, पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे."
"तुम्ही कानाखाली मारलीत त्याचीही गरज नव्हती. एवढीच जर हिंमत असेल तर 2 तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा. मग आम्ही दाखवतो, राज ठाकरेंचे कट्टर मनसैनिक काय आहेत ते…जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला", असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
"पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज ठाकरेंची शिकवण आहे म्हणून ही गोष्ट सहन करतोय. ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा,” असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी वसईत आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात पोलिसांची नजर चुकवून दोन कार्यकर्ते कार्यक्रमात शिरले आणि त्यांनी “आयुक्त साहेब वेळ द्या” अशी घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना मारहाण करून पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
0 Comments