सोलापूर/प्रतिनिधी:
यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ९३ हजार ७५४ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.
या गाळपातून तीन लाख ५८ हजार ४३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत झालेल्या ऊस गाळपातून जिल्ह्यातील सरासरी साखर उतारा हा ७.२६ टक्के मिळाला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू होतील असा अंदाज आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या कारखानानी भैरवनाथ शुगर युनिट नंबर 3, इंद्रेश्वर शुगर, सिद्धनाथ शुगर, विठ्ठल कार्पोरेशन, दि. सासवड माळी शुगर, लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रिज, कै. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पांडुरंग सहकारी साखर कारखाना व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना या कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाला शुभारंभ केल्यापासून ते आतापर्यंत चार लाख ९३ हजार ७५४ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या खासगी व सहकारी तत्वावरील ३९ साखर कारखान्यांपैकी आज अखेरपर्यंत नऊ साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाला शुभारंभ झाला आहे. या नऊ साखर कारखान्यांमध्ये सहा खासगी कारखाने तर तीन सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी, नाले व ओढ्यांना आलेला महापुरामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस गाळपासाठी नुकसानग्रस्त उसाला प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे.
0 Comments