फळ पीक विमा योजनेत सहभागी व्हा ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन



सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (आंबिया बहार) राबविण्यात येत आहे. सन २०२०-२१ मध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा या ५ फळपिकांच्या हवामानाच्या धोक्यानुसार विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षित आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते, त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. 

मोसंबी तीन वर्षे, डाळिंब दोन वर्षे, द्राक्षे दोन वर्षे आणि आंबा पाच वर्षे, असे अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय आहे. 

ही योजना सन २०२०-२१ आंबिया बहारमध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्स्चेंज टॉवर्स, २० वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट मुंबई-४०००२३ टोल फ्री क्र. : १८००११६५१५, दूरध्वनी क्र. ०२२-६१७१०९१२ ई-मेल- mhwbcis@aicofindia.com

शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था /बँक/आपले सरकार सेवा केंद्र/ विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे/ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे. द्राक्ष- १५ ऑक्टोबर २०२०, मोसंबी आणि केळी- ३१ ऑक्टोबर २०२०, आंबा आणि डाळिंब - ३१ डिसेंबर २०२०.

आंबिया बहार सन २०२०-२१ या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निर्धारित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत देय होणार आहे. अवेळी पाऊस, जास्त किंवा कमी तापमान, जास्त पाऊस आणि आर्द्रता, गारपिट, वेगाचा वारा, दैनंदिन कमी तापमान हे धोके आल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळविल्यास विम्याची रक्कम मिळते, असे श्री. माने यांनी सांगितले.

द्राक्ष पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२० आहे. फळपिकांच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरु करण्यात आले आहे. इतर अधिसूचित फळ पिकांसाठीही संकेतस्थळ या आठवड्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in पाहता येईल. तसेच ई-सेवा केंद्र व बँक स्तरावरही याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सूचना कृषी विभागाने सहभागी विमा कंपन्यांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments