आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्याना मिळणार ११४ कोटीची थकहमी



सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांना राज्य शासनाने ११४ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर होणार आहे. सहा साखर कारखान्यांना राज्य शासनाने थकहमी मंजूर केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. या मदतीमुळे पंढरपूर, माळशिस, माढा आणि मंगळवेढा येथील सहा साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. 

 राज्य शासनाने राज्यातील ३२ कारखान्यांसह सोलापूर जिल्ह्यातील आमदार भालकेंच्या विठ्ठल (३०कोटी ९८ लाख), भाजप नेते कल्याणराव काळेंच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे (१४ कोटी ५२ लाख), धनंजय महाडिकांच्या भीमा (२० कोटी २२ लाख), शिवसेना नेते समाधान आवताडेंच्या संत दामाजी (१० कोटी ५८ लाख), धनाजी साठेंच्या कूर्मदास (५ कोटी १५लाख) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार महर्षीला (३३ कोटी २४लाख) या कारखान्यांना राज्य शासनाने ११४ कोटी ६७ लाख रुपयांची हमी दिली आहे.


पंढरपूर येथील विठ्ठल साखर कारखान्याला राज्य शासनाने (२०१९-२०) गाळप हंगामासाठी अनुक्रमे १२ कोटी रुपयांच्या अल्पमुदत कर्जास शासनाने हमी दिली आहे. विठ्ठल कारखान्यांनी शासन हमीवर घेतलेल्या कर्जाची व्याजासह सप्टेंबर २०२१ पर्यंत परतफेड करणे आवश्‍यक आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील या साखर कारखान्याला राज्यात सर्वाधिक ३३ कोटी २४ लाख रुपयांची हमी मंजूर केली आहे. त्या खालोखाल आमदार भालकेंच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ३० कोटी ९८ लाख रुपयांची हमी मंजूर झाली आहे. पंढरपूर येथील विठ्ठल, सहकार शिरोमणी, माढा तालुक्‍यातील कूर्मदास हे साखर कारखाने बंद करण्याच्या मार्गावर होते. कारखान्यांना यावर्षी गाळप हंगाम सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे.

  यासंदर्भात काल (ता. ०९) राज्य शासनाच्या वित्त आणि सहकार वस्त्रोद्योग विभागाने अद्यादेश काढला आहे. राज्य शासनाने थकहमी दिली असली तरी संबंधित बॅकेला कर्ज वसुलीचे अधिकार दिले आहेत. घेतलेल्या कर्ज फेडीसाठी संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळाची सामूहिक जबाबदारी देखील यामध्ये निश्‍चित केली आहे.

Post a Comment

0 Comments