पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे तयार करा घरीचकृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला



सोलापूर,दि.१० : सोलापूर जिल्ह्यात यंदा अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बियाणे कंपन्याही पुढच्या वर्षी सोयाबीनचे बियाणे पुरवठा करण्याच्या मानसिकतेत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनचे बियाणे तयार करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
            
यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर अखेर ४२८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून याची टक्केवारी ११९.७आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेराही वाढला असून ६१ हजार २०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी १६२ टक्के आहे. यात बार्शी तालुक्यातील क्षेत्र ३१ हजार ७४९हेक्टर आहे. काही ठिकाणी बियाण्यांच्या तक्रारी आल्या असून यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी घरच्या घरीच बियाणे तयार करावे लागणार आहे. बियाणांचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे शेतावरच तयार करता येणार आहे. याची प्रक्रियाही सोपी आहे.
बियाणांची निर्मिती, काढणी आणि साठवणूक यावेळी काळजी घेतल्यास दर्जेदार, गुणत्तापूर्ण बियाणे घरच्या घरी तयार करू शकतो, असेही श्री. माने यांनी सांगितले.

बियाणे तयार करण्याची पद्धत आणि घ्यावयाची काळजी

◆ज्या शेतातील बियाणे तयार करणार आहोत, तेथील तण, भेसळ, रोगट, शेंगा भरत असलेली झाडे काढून टाकावीत.

◆ कीड आणि रोगाचा बंदोबस्त करावा. शेंगा भरत असताना आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी, त्यामुळे साठवणुकीमध्ये बुरशी वाढणार नाही.

◆ चारही बाजूला त्याच वाणाचे सोयाबीन असावे. नसेल तर ज्या बाजूला वाणाचे बियाणे नाही, त्या बाजूला बांधापासून 3 मीटर आतपर्यंतची झाडे बियाणासाठी काढणीच्यावेळी घेऊ नयेत.

◆ कापणी वेळीच करावी. कापणीनंतर पावसात भिजलेले बियाणे राखून ठेऊ नये.

◆ सोयाबीन पीक परिपक्व अवस्थेत असताना पाऊस आल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कायम राखण्यासाठी कापणीपूर्वी बाविस्टीन किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची फवारणी करावी.

◆ कापणीनंतर बियाण्यातील आर्द्रता १३-१४ टक्के आणण्यासाठी १ ते २ दिवस बियाणे उन्हात सुकवावे. उत्पादित बियाणांची आर्द्रता १४ टक्के असेल तर मळणी यंत्राचा वेग ४०० ते ५००आरपीएम आणि १३ टक्के असेल तर वेग ३०० ते ४०० आरपीएम असावा. अन्यथा बियाणांमध्ये तांत्रिक नुकसान होऊ शकते.

◆ बियाणे वाळविताना मोठा ढीग न करता पातळ थरावर वाळवावे. साठवणूक करण्यापूर्वी बियाणातील आर्द्रता ९ ते १२ टक्के असेल याची काळजी घ्यावी.

◆  वाळलेले आणि स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूट बारदानामध्ये भरावे. पोत्यामध्ये साधारण ६० किलोपर्यंत बियाणे साठवावे.

◆ साठवणूक करतेवेळी एकावर एक थप्पी ठेवण्याऐवजी बियाणे वेगळे ठेवावे. जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळ्यांचा वापर करून कोरड्या जागी साठवणूक करावी.

◆ पोत्याची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाणांची गुणवत्ता जास्त काळ टिकण्यास मदत होईल. बियाणे नाजूक असल्याने उंचावरून आदळणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

◆आपल्या बियाणांची उगवणक्षमता तीनवेळा म्हणजे डिसेंबर, मार्च आणि जूनमध्ये चाचणी करूनच पेरणी करावी.

Post a Comment

0 Comments