धाराशिव जिल्ह्यात पत्रकारांवर वाढत्या दडपशाहीविरोधात एकजूट; पत्रकारांनी अधिकार्‍याला दिले निवेदन


धाराशिव : जिल्ह्यातील पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय, दडपशाही आणि खोट्या गुन्ह्यांच्या धमक्यांविरोधात पत्रकार एकवटून उभे राहिले आहेत. या संदर्भात पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पत्रकार समाजाच्या घडामोडी, जनहिताचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रामाणिकपणे जनतेपर्यंत पोहोचवतात. पण अलीकडेच्या काळात पत्रकारांवर अन्याय, दडपशाही आणि खोट्या आरोपांचे प्रयत्न चालू आहेत. उदाहरणार्थ, दैनिक प्रजापत्रचे प्रतिनिधी चंद्रमणी गायकवाड यांना अवैध धंद्यांबाबत प्रश्न विचारल्यामुळे एनसी दाखल करून दबाव निर्माण करण्यात आला. तसेच, धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांना तुळजापूर पोलिसांनी धमकावले, तर आनंद कंदले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ढेपे यांना धमकावले.


पत्रकारांवर खोटे गुन्हे नोंदवणे, हल्ले करणे आणि जीवितास धोका निर्माण करणे यासारख्या गंभीर प्रकारांमुळे पत्रकारितेला धोका निर्माण झाला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुचवण्यात आले आहे.

या निवेदनावर हुंकार बनसोडे, राजाभाऊ वैद्य, संतोष जाधव, बालाजी निरफळ यासहित जिल्ह्यातील अनेक पत्रकारांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments