मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला थेट इशारा!


 गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाचा फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला बसला आहे. अशातच आता मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठं विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत जास्त फजिती होणार :
लोकसभा निवडणुकीत आता यांची थोडी फजिती झाली आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीत आणखी जास्त फजिती होणार असल्याचा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी ते 8 जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी देखील केली आहे. तसेच आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहणार आहे असे देखील ते म्हणाले आहेत. याशिवाय अंतरवाली सराटी येथे उपोषणाच्या काळातच सरकारने आमच्या मागण्या देखील पूर्ण कराव्यात, अन्यथा सरकारला आमचा रोष परवडणारा नाही, असा सूचक इशाराही उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात देखील मोठे भाष्य केले आहे. काल झालेल्या शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीत मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलो होतो. त्यावेळी आमची मराठा आरक्षणाबाबत देखील चर्चा झाली. यावर लवकरच आम्ही तोडगा काढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले आहेत.

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यावेळी त्यांनी आपली तब्येत खालावली असल्याचे सांगितले आहे. मात्र असे असतानाही मराठा बांधवांनी शेतीची कामं सोडून इकडे येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्यासाठी शेती हि अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे काम सोडून कोणीही अंतरवाली सराटीत येऊ नका असे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments