येत्या विधानसभेत सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, सुभाष देशमुख यांना धोक्याची घंटा


सोलापूर |


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत, महाराष्ट्र सोबतच सोलापूर शहर आणि जिल्ह्याची सुद्धा राजकीय समीकरणे बदलणार यात कोणती शंका नाही. लोकसभेचा हा निकाल अनेक दिग्गज नेत्यांसाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सुमारे 75 हजाराच्या मताधिक्याने भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव केला. एकूणच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी पाहिली असता भाजपच्या आमदारांसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा मानली जात आहे.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शहर उत्तर आणि अक्कलकोट मतदार संघाने भाजपला मोठे मताधिक्य दिले होते. 2019 च्या निवडणुकीचा विचार केला तर शहर उत्तर मध्ये सुमारे 65 हजार हून अधिक  माजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मताधिक्य मिळाले तसेच अक्कलकोट मतदारसंघातून 36 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या निवडणुकीत शहर उत्तर मधून किमान पन्नास हजार पेक्षा अधिक मताधिक्य आणि अक्कलकोट मतदारसंघातून वीस ते पंचवीस हजार इतका लीड मिळण्याची अपेक्षा होती.

 शहर उत्तर मध्ये भाजपला 36 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख हे सेफ झोन मध्ये असल्याचे बोलले जाते. परंतु जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून पक्षाचा अपेक्षाभंग झाला असून अक्कलकोट मधून केवळ 9297 मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याणशेट्टी यांची अडचण होण्याची शक्यता आहे.

 सोलापूर दक्षिण मतदारसंघातून यापूर्वी भाजपला किमान 25 हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळायचे परंतु यावेळी उलट काँग्रेस पक्षाला 9436 मताधिक्य मिळाले आहे ही आकडेवारी पाहता विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे.

 पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजय झालेले भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना तर सर्वात मोठी अडचण असून या मतदारसंघात काँग्रेसला किमान 45 हजारापर्यंत मताधिक्य मिळाले आहे हे आवताडे यांच्यासाठी भविष्यात अडचण वाढणारी लीड म्हणावी लागेल.

Post a Comment

0 Comments