म्हणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही ! अजित पवारांचा शरद पवारांवर गंभीर आरोप


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यात सतत शाब्दिक वार सुरू असतात. अशात अजित पवारांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करत शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय. त्यांनी 2004 सालच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठा खुलासा केलाय.

झालं असं की, 2004 च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळालं होतं. यात राष्ट्रवादी काँग्रेसला 71 तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादीच्या जास्त जागा असूनही मुख्यमंत्री पद हे कॉँग्रेसला मिळालं होतं.

याबाबत अजित पवारांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. त्यावर शरद पवार यांनी म्हटलं होतं की, “2004 च्या निवडणुकीनंतर आमच्या पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं आणि छगन भुजबळ किंवा इतर कुठल्या नेत्याला आम्ही मुख्यमंत्री बनवलं असतं तर पक्ष फुटला असता.” शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.


काय म्हणाले अजित पवार?
“2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आमचा पक्ष फुटला असता हे शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं असून शरद पवारांबरोबरच्या त्यावेळच्या चर्चेत मी देखील होतो. आमच्याबरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशी सगळी वरिष्ठ मंडळी होती.”, असं अजित पवार  यांनी सांगितलं.

तसंच पुढे ते म्हणाले की, “तेव्हा आम्हाला वाटलं की, मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच असायला हवं. तेव्हा मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नव्हतो. मला वाटत होतं की छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री पद मिळावं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थाने कोणी जर आमचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं असेल तर ते काम छगन भुजबळांनी केलं आहे. “, असंही अजित पवार म्हणाले.

“..तितकी वर्षे राज्यात आमचाच मुख्यमंत्री राहिला असता”
पुढे अजित पवारांनी अजून एक खुलासा केला. “2004 मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर तिथून पुढे जितकी वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली, तितकी वर्षे राज्यात आमचाच मुख्यमंत्री राहिला असता. आमच्यापैकी कोणताही नेता मुख्यमंत्रीपदावर बसला असता, कदाचित छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. त्यानंतर आर. आर. पाटील आणि इतर नेतेही मुख्यमंत्री होऊ शकले असते.”, असा दावाच यावेळी अजित पवार यांनी केला

Post a Comment

0 Comments