चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली 'ही' मोठी मागणी

मुंबई|

 बिहारनंतर  महाराष्ट्रात आता जातनिहाय जनगणना होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. सत्तेत असलेले शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती सरकार यावर काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण यातील भाजपकडून आपली भूमिका काय असेल हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशी मागणी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे करणार असल्याची मोठी घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत त्यांनी ही घोषणा केली.  बिहारमध्ये नीतीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणनेचा अहवाल जारी केला आहे. बिहारमध्ये ओबीसींच्या जातनिहाय गणनेचा अहवाल सादर होताच राज्यात भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत महाराष्ट्रात ही ओबीसींची जात निहाय गणना करावी अशी मागणी करण्यात आली. यात्रेत उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे ओबीसींची जात निहाय गणना करण्याची मागणी करेल असे जाहीर केले.

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसीच्या विविध जातींचा सर्वे करावा अशी मागणी भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. ते म्हणाले की, "आताच बिहार सरकारने ओबीसींच्या गणनेचे आकडे जाहीर केले आहे. मी बावनकुळे यांच्याकडे मागणी करतो की आधीच महाराष्ट्र विधानसभेने एकमुखाने ओबीसी आणि इतर जातीच्या गणण्याची मागणी केलेली आहे. बिहारच्या या जातनिहाय गणनेनंतर बावनकुळे यांना विनंती आहे, आपण सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात, आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसी मधील विविध जातींचा सर्वे करून आकडे जाहीर करण्याची मागणी सरकारकडे करावी."

आशिष देशमुख यांनी ओबीसी जनगणनेची मागणी केल्यानंतर त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "बिहारचा जो रिपोर्ट आज आला आहे, त्यानंतर आशिष देशमुख यांनी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने ओबीसींचा सामाजिक आर्थिक स्टॅटिस्टिक डेटा जाहीर करावा. ओबीसींची संख्या किती आहे याचा डेटा राज्य सरकारने सर्वे तयार करून तो जाहीर करावा, यासंदर्भात आम्ही राज्य सरकारला विनंती करू."

Post a Comment

0 Comments