राज्यातील सरकार कॉमेडी शोसारखं!; जनतेशी देणंघेणं नाही, काँग्रेस रस्त्यावर उतरणार; नाना पटोलेंचा इशारा

 

राज्यातील शिंदे सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  टीकास्त्र डागलंय. राज्यातील सरकार कॉमेडी शोसारखं असल्याचं नाना पटोले म्हणालेत. भाजप सरकार अत्याचारी आहे. सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. राज्यातील सरकार कॉमेडी शो सारखे आहे. इथल्या जनेतचं सरकारला काही देणंघेणं नाही. राज्यातील सरकार झोपी गेलेलं आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे .दुष्काळ जाहीर केला पाहिजे. पण तो होत नाही. शेतकरी अडचणीत आहे. सामान्य नागरिक महागाईने त्रस्त आहे. यावर सरकार काही करत नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधलाय. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील रुग्णालयं स्मशानभूमी झाली आहेत. पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहेत. ललित पाटील याला फरार करण्यात डॉक्टरांचं योगदान आहे. सध्या राज्यात गंभीर स्थिती आहे. या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. सरकारच्या धोरणांचा निषेध करणार आहे, असं नाना पटोले म्हणाले.

जातिनिहाय ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ही काँगेसची भूमिका आहे. पापाच पिळत उघड होऊ नये म्हणून ओबीसी जनगणना हे सरकार करत नाही. बहुमत आणण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी खोक्यांनी लोक जमा केले. सत्ता तुमच्या हातात आहे. मग जनगणना का करत नाही? देशात गरिबी निर्माण करण्याच काम पंतप्रधान मोदी सरकारने केलं आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना भाजप वॉशिंग मशीनमध्ये धुवून सत्तेत सहभागी करतात. लोकांचा आता यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे जनतेच्या कॉंग्रेसकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नकली कार्यक्रम करण्याची गरज काँग्रेसला नाही. दिलेला शब्द पाळणारे नेते राहुल गांधी आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

पाकिस्तानमध्ये 309 रुपयांत सिलेंडर विकत मिळतो. आपल्याकडे मात्र सिलेंडरच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला लुटल्या जातंय. राज्य आणि केंद्र मधील सरकार हुकुशाही सरकार आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देण्याच पाप हे सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांनी टोमॅटो आणि कांदे फेकून मारले. महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती ही भयावह आहे. सरकार विरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे, असं नाना पटोले म्हणाले.


Post a Comment

0 Comments