अखेर १७ व्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण



जालना |

 मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या आश्‍वासनानंतर १७ व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती यावेळी पाहायला मिळत आहे. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. 

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. विशेष म्हणजे आमरण उपोषण मागे घेतलं असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहेत. 

दरम्यान उपोषण सोडतांना जरांगे म्हणाले की, शिंदेसाहेब न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी आज समोर येऊन सिद्ध केलं. मी भारावून न जाता आरक्षणाच्या प्रश्नासाठी शिंदे साहेबांच्या मागेच लागणार. आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिंदे साहेब येणार म्हटले आणि मी ही त्यांना आणून दाखवले. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही शिंदे साहेबांना हटू देणार नाही.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमच्या सरकारच्या जबाबदारी असून, ती आम्ही देणारच असल्याचे मुख्यंमत्री शिंदे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण देणं सरकारची इच्छा आहे. तसेच न्यायालयात टिकणारे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. पण, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मुख्यंमत्री शिंदे म्हणाले.

Post a Comment

0 Comments