अजूनही वेळ गेली नाही, राहुल गांधी यांनी लग्न करावं, आम्ही वऱ्हाडी होऊ




राहुल गांधी यांनी आता लग्न करावं, सोनिया गांधी यांचीही तीच इच्छा आहे, असा आग्रह राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केला आणि हास्याचा एकच फवारा उठला. निमित्त होतं ते देशभरातील विरोधी पक्षनेत्यांच्या पाटण्यातील बैठकीचं. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत लालू प्रसाद यांनी हे वक्तव्य केलं. 

लालू प्रसाद यादव म्हणाले की, "राहुल गांधी चांगलं काम करत आहेत. भारत जोडोच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण देश पालथा घातला. राहुल गांधी यांनी लोकसभेतही चांगलं काम केलं आहे. राहुल गांधी यांनी लग्न करावं हा आमचा सल्ला त्यांनी मानला नाही. त्यांनी लग्न करावं, अजूनही वेळ गेली नाही. राहुल गांधी दुल्हा बने, हम बाराती बन जाएंगे."

लालू प्रसाद म्हणाले की, "येत्या काळात शिमल्यात पुढची बैठक होणार आहे. देशात विरोधी पक्षांची मोठी ताकद आहे, पण एकजूट होत नसल्याने त्यांना मतं मिळत नाहीत असं लोक आम्हाला सांगायचे. आता आम्ही एकजूट झालो आहोत. त्यामुळे भाजपला सत्तेतून बाहेर काढू. नरेंद्र मोदी देशाचे नेते राहिले नाहीत, ते आता अमेरिकेत चंदनाच्या काड्या वाटत आहेत."

देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर बोलताना लालू प्रसाद यादव म्हणाले की, "देशात महागाईने टोक गाठलं असून डाळी आणि भाज्या महागल्या आहेत. देशातील बेरोजगारी वाढत आहे. पण देशात हिंदू-मुस्लिम दंगली होत आहेत. हनुमानजींच्या नावावर मतं मागितली जातात. पण आता हनुमानजी आमच्या सोबत आहेत. येत्या काळात भाजपचे आणि नरेंद्र मोदी यांची स्थिती वाईट होणार आहे."

Post a Comment

0 Comments